सावधान! दूषित पाण्यामुळे महाराष्ट्र आजारी; आरोग्य विभागाची चिंताजनक आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 08:08 IST2026-03-08T08:08:40+5:302026-03-08T08:08:52+5:30
दूषित पाणी, अस्वच्छतेमुळे या आजारांचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांनी वर्तविले आहे.

सावधान! दूषित पाण्यामुळे महाराष्ट्र आजारी; आरोग्य विभागाची चिंताजनक आकडेवारी
मुंबई : राज्यात कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, संसर्गजन्य कावीळ, विषमज्वर, लेप्टोस्पायरोसिस अशा जलजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. दूषित पाणी, अस्वच्छतेमुळे या आजारांचा प्रसार होण्याची शक्यता अधिक असल्याचे तज्ज्ञांनी वर्तविले आहे.
आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या माहितीनुसार, २०२५ मध्ये अतिसार आणि गॅस्ट्रोचे रुग्ण सर्वाधिक नोंदवले गेले आहेत. २०२५ मध्ये अतिसाराचे ३ लाख ६८ हजार ७८७ रुग्ण आढळले असून, हा आकडा मागील दोन वर्षांच्या तुलनेत वाढला आहे. २०२३ मध्ये अतिसाराचे ३ लाख २५ हजार ९२७ रुग्ण होते, तर २०२४ मध्ये ही संख्या ३ लाख ६५ हजार १९२ इतकी होती.
गेल्या तीन वर्षांचा आढावा
गॅस्ट्रोच्या बाबतीत २०२५ मध्ये २३ हजार ६८८ रुग्णांची नोंद झाली आहे. २०२३ मध्ये २७ हजार ७५७ आणि २०२४ मध्ये २७ हजार ५८२ रुग्ण नोंदवले गेले होते.
कॉलऱ्याच्या रुग्णसंख्येतही चढ-उतार दिसून आला आहे. २०२३ मध्ये २२ रुग्ण आणि १ मृत्यू नोंदवला गेला होता, तर २०२४ मध्ये कॉलऱ्याचे १,०२८ रुग्ण व ४ मृत्यू झाले होते.
२०२५ मध्ये कॉलऱ्याचे २०३ रुग्ण आढळले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
लेप्टोस्पायरोसिसचे अनेक बळी
संसर्गजन्य काविळीचे २०२५ मध्ये ३,४५९ रुग्ण नोंदवले गेले असून, ३ मृत्यूंची नोंद आहे. विषमज्वराच्या रुग्णांची संख्या २०२५ मध्ये ४३,०४७ इतकी आहे. याशिवाय लेप्टोस्पायरोसिसचे २०२५ मध्ये ८५८ रुग्ण आढळले असून २१ जणांचा मृत्यू झाला आहे. २०२४ मध्ये लेप्टोस्पायरोसिसमुळे २६ मृत्यू नोंदवले गेले होते.
बचावासाठी काय कराल?
आरोग्य विभागाने या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाणी शुद्धीकरण, स्वच्छता मोहिमा, रोगनियंत्रण पथके आणि जनजागृती कार्यक्रम राबविले आहेत.
नागरिकांनी स्वच्छ पाणी पिणे, अन्न स्वच्छ ठेवणे आणि परिसर स्वच्छ राखणे यांसारख्या उपाययोजना केल्यास जलजन्य आजारांपासून बचाव होऊ शकतो, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.