बेस्ट जनतेच्या पैशावर चालते, मग जनतेला वेठीस का धरताय? हायकोर्टाचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 18:59 IST2019-01-15T17:24:35+5:302019-01-15T18:59:41+5:30
आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सलग आठव्या दिवशीही सुरू आहे.

बेस्ट जनतेच्या पैशावर चालते, मग जनतेला वेठीस का धरताय? हायकोर्टाचा सवाल
मुंबई - आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सलग आठव्या दिवशीही सुरू आहे. हा संप सोडवण्यासाठी गेल्या आठ दिवसांत करण्यात आलेले अनेक प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर हायकोर्टात सुरू असलेल्या आजही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, बेस्ट जनतेच्या पैशावर चालते, मग जनता वेठीस का धरताय, असा सवाल मुंबई हायकोर्टाने केला आहे. तसेच हा संप मिटवण्यासाठी तातडीने निर्णय घ्या, असे आदेश कोर्टाने बेस्ट प्रशासन आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे.
मुंबईतील बेस्ट परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाची गंभीर दखल हायकोर्टाने घेतली आहे. तसेच या प्रकरणी ताठर भूमिकेत असलेले बेस्ट प्रशासन आणि संपकरी कर्मचाऱ्यांनाही कोर्टाने फटकार लगावली आहे. बेस्टची सेवा ही जनतेच्या पैशावर चालते मग जनतेलाच का वेठीस धरताय, असा सवाल कोर्टाने केला आहे. तसेच संप मिटवण्यासाठी संबंधीतांनी तातडीने पावले उचलावीत, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.
दरम्यान, काल झालेल्या सुनावणीमध्येही न्यायालयाने बेस्टच्या संपकरी कर्मचाऱ्यांना फटकारले होते. ‘तुमच्या मागण्या रास्त असल्या तरी त्यासाठी सामान्यांना वेठीस धरू नका. या संपावर राज्य सरकार आणि युनियनने तोडगा काढावा. त्यात ते अपयशी ठरले तर आम्ही मंगळवारी योग्य तो आदेश देऊ,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने संपकरी बेस्ट कर्मचा-यांना व सरकारला सुनावले.