बॅंकांचे तिप्पट कर्ज केले ‘राइट ऑफ’; १२ टक्के वसुली, परदेशी बँकांनाही लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 05:04 AM2020-12-21T05:04:52+5:302020-12-21T05:05:25+5:30
Bank : युपीएच्या कार्यकाळात सरकारी बँकांचे १ लाख ५८ हजार ९९४ काेटी, खासगी बँकांचे ४१ हजार ३९१ काेटी आणि परदेशी बँकांचे १९ हजार ९४५ काेटींचे कर्ज निर्लेखित करण्यात आले हाेते.
![Banks tripled 'write off'; 12 per cent recovery, benefits to foreign banks | बॅंकांचे तिप्पट कर्ज केले ‘राइट ऑफ’; १२ टक्के वसुली, परदेशी बँकांनाही लाभ Banks tripled 'write off'; 12 per cent recovery, benefits to foreign banks | बॅंकांचे तिप्पट कर्ज केले ‘राइट ऑफ’; १२ टक्के वसुली, परदेशी बँकांनाही लाभ](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/cash_20180365845.jpg)
बॅंकांचे तिप्पट कर्ज केले ‘राइट ऑफ’; १२ टक्के वसुली, परदेशी बँकांनाही लाभ
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वातील ‘एनडीए’ सरकारने सर्वाधिक बुडीत कर्जे निर्लेखित (राइट ऑफ) केली आहेत. पूर्वीच्या काँग्रेसच्या नेतृत्त्वातील ‘यूपीए’ सरकारने निर्लेखित केलेल्या कर्जापेक्षा हा आकडा तिप्पट असल्याची धक्कादायक माहिती आहे.
माहितीच्या अधिकारांतर्गत पुण्यातील प्रफुल्ल सारडा यांनी माहिती मागविली हाेती. त्यांना प्राप्त झालेली माहिती धक्कादायक आहे. युपीएच्या कार्यकाळात २ लाख २० हजार काेटी रुपयांचे कर्ज निर्लेखित करण्यात आले हाेते. तर, २०१५ ते २०१९ या कालावधीत हा आकडा ७ लाख ९४ हजार ३५४ काेटी रुपयांपर्यंत पाेहाेचला. यामुळे बँकांचा ‘एनपीए’ कमी झाला. परदेशी बँकांचे कर्ज निर्लेखित करण्याबाबत सारडा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
युपीएच्या कार्यकाळात सरकारी बँकांचे १ लाख ५८ हजार ९९४ काेटी, खासगी बँकांचे ४१ हजार ३९१ काेटी आणि परदेशी बँकांचे १९ हजार ९४५ काेटींचे कर्ज निर्लेखित करण्यात आले हाेते. यामध्ये एकाही शेड्युल्ड बँकेचा समावेश नव्हता. (आयएएनएस)
७२ फरार, अटक दाेघांनाच
- विजय माल्या, मेहुल चाेक्सी आणि नीरव माेदींसारखे एकूण ७२ जण कर्ज बुडवून देशाबाहेर फरार झाले आहेत. त्यापैकी केवळ दाेघांनाच पकडण्यात आले आहे.
- एनडीएच्या काळात हाच आकडा अनुक्रमे ६ लाख २४ हजार ३७० काेटी, १ लाख ५१ हजार काेटी आणि १७ हजार ९९५ काेटी रुपये एवढा हाेता. शेड्युल्ड बँकांचेही १ हजार २९५ काेटींचे कर्ज निर्लेखित करण्यात आले.
- एनडीएच्या कार्यकाळात कर्जवसुलीही झाली आहे. सुमारे ८२ हजार ५७१ काेटी रुपयांचे कर्ज वसूल करण्यात आले आहे.
तर युपीएच्या काळात कर्जवसुली झालेली नाही.