विधानसभा निवडणुका पुढे ढकला, राज ठाकरेंची आयोगाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 14:44 IST2019-08-10T14:38:57+5:302019-08-10T14:44:26+5:30
भाजपा सरकारला आणि या मंत्र्यांना जनतेशी काहीही देणं घेण नाही.

विधानसभा निवडणुका पुढे ढकला, राज ठाकरेंची आयोगाकडे मागणी
मुंबई - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज्यातील सद्यपरिस्थिती पाहता आयोगाने हा निर्णय घ्याव. कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून लोकांना उभा करणं, त्यांची घरं उभारणं हे महत्त्वाच आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी राज यांनी केली आहे.
भाजपा सरकारला आणि या मंत्र्यांना जनतेशी काहीही देणं घेण नाही. यांचे 250, 230 जागा येणार असे आकडेही ठरले आहेत. तुम्ही पुरात अडका किंवा दुष्काळात लटका आम्हाला काय करायचंय, अशीच सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे. सध्याची पूरस्थिती पाहता तेथील नागरिकांचा प्रश्न गंभीर आहे. पावसाचे पाणी ओसरल्यानंतरही रोगराई आणि तेथील जनजीवन सुरळीत करण्याचा मोठा प्रश्न आहे. कोल्हापूर, सांगली आणि आजुबाजूचा परिसर आटोक्यात येण्यासाठी किमान 6 महिन्यांचा कालावधी जाईल. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे ढकलाव्यात. त्यासाठी मी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिणार असल्याचे राज ठाकरेंनी म्हटले आहे. दरम्यान, पुढील दोन महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार आणि प्रसाराची जय्यत तयारी सुरू आहे.
महाराष्ट्रावर आलेलं संकट हे अस्मानी तर आहेच परंतु सुलतानी जास्त आहे, SANDRP या संस्थेच्या अहवालानुसार जलसंपदा विभागाच्या गलथान कारभारामुळे ही परिस्थिती महाराष्ट्रावर आली आहे, तरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण गांभीर्याने यातून बोध घेणं आवश्यक आहे.https://t.co/wbbmGcszzo
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) August 10, 2019