Ashish Shelar : 'आमच्या दर्यावर्दींना उध्वस्त कराल तर आई एकविरेची शपथ, खबरदार !'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 19:59 IST2022-01-07T19:57:39+5:302022-01-07T19:59:02+5:30
आमदार अँड आशिष शेलार यांनी आज याबाबत प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेतील सत्ताधारी मूळ मुंबईकर असलेल्या कोळी, आगरी बांधवांना उध्वस्त करीत असल्याचा आरोप केला आहे.

Ashish Shelar : 'आमच्या दर्यावर्दींना उध्वस्त कराल तर आई एकविरेची शपथ, खबरदार !'
मुंबई - मूळ मुंबईकर असलेल्या समुद्राच्या लाटा झेलणाऱ्या या आमच्या दर्यावर्दींना उध्वस्त कराल तर आई एकविरेची शपथ, खबरदार, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आज सत्ताधारी शिवसेनेला एकप्रकारे इशाराच दिला आहे. वरळी येथील कोळी बांधव कोस्टल रोडबाबत आपले म्हणणे समजून घ्या म्हणून वारंवार सरकारला विनंती करीत असून गुरुवारी याबाबत सरकार आणि पालिकेने संयुक्त बैठक घेतली. पण, त्यामध्ये सुध्दा कोळी बांधवांचे म्हणणे ऐकून न घेताच आपलाच मुद्दा रेटण्यात आल्याचे शेलार यांनी सांगतले.
आमदार अँड आशिष शेलार यांनी आज याबाबत प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेतील सत्ताधारी मूळ मुंबईकर असलेल्या कोळी, आगरी बांधवांना उध्वस्त करीत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, मुंबईचा मूळ रहिवासी असलेल्या कोळी बांधवांना हक्काचे घर मिळावे, कोळीवाडे, गावठाणांचा पुनर्विकास व्हावा म्हणून स्वतंत्र डिसीआर केला नाही. 500 चौ.फु. घरांना मालमत्ता कर माफ केला. पण, त्याचा फायदा आमच्या कोळी बांधवांना होणार नाही. चक्रीवादळात त्यांना मदत केली नाहीत.समुद्राचे पाणी गोडे करुन मुळ मुंबईकर आगरी, कोळी बांधवांचे समूळ उच्चाटन तुम्ही करणार? कोस्टल रोडसाठी बैठकांचे नाटक करुन स्वतःचेच खरे करायला निघालात काय? म्हणून हा इशारा समजा, समुद्राच्या लाटा झेलणाऱ्या या आमच्या दर्यावर्दींना उध्वस्त कराल तर आई एकविरेची शपथ, खबरदार, अशा शब्दांत त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.