Mumbai : नालेसफाईच्या नावावर सत्ताधाऱ्यांची हातसफाई; आमदार आशिष शेलार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 16:57 IST2021-06-07T16:54:44+5:302021-06-07T16:57:09+5:30
Ashish Shelar : ... अन्यथा वेलारसू यांच्या घरासमोर कचरा टाकू; शेलार यांचा इशारा. १०७ टक्के नालेसफाईचा दावा फोल, शेलार यांचं वक्तव्य.

Mumbai : नालेसफाईच्या नावावर सत्ताधाऱ्यांची हातसफाई; आमदार आशिष शेलार यांची टीका
"मुंबई शहरातील नाल्यांची सफाई १०७ टक्के झाल्याचा दावा फोल असून ही नालेसफाई नव्हे, तर सत्ताधाऱ्यांची हातसफाई आहे. जर मुंबईकरांना वेठीस धरत असाल तर दावे करणाऱ्या स्थायी समिती, महपौरांचे हे पाप आहे. तर अतिरिक्त आयुक्त वेलारसू घरासमोर नाल्यातील गाळ नेऊन टाकू," अशा शब्दांत आज भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी शिवसेना आणि पालिका प्रशासनावर हल्लाबोल केला.
मुंबई शहरातील नालेसफाईचा आढावा घेण्यासाठी भाजपा नेते आमदार ॲड. आशिष शेलार, भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, पक्षनेता विनोद मिश्रा, स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट व भाजप नगरसेवक यांनी शहरातील नालेसफाईचा पाहणी दौरा पूर्ण केला. "नालेसफाईबाबत पालिका प्रशासन आणि शिवसेना मुंबईकरांच्या डोळ्यात धुळफेक करीत आहेत. नाल्यांमध्ये कचरा असल्याने पावसाळ्यात ते तुंबून त्याचा मुंबईकरांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईकरांची फसवणूक करणारे प्रशासन आणि शिवसेनेला सभागृहात उत्तर देऊ," असा इशारा भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला.
"गजधरबंध, पीएनटी नाला, पोईसर नदी, जनकल्याण नगर नाला, वळनाई नाला, सोमैया नाला, जिजामाता नगर माहुल नाला हे सर्व नाले अद्याप गाळ, दगडमाती यांनी भरलेले आहेत. मुंबईच्या महापौर या नाल्यांचा दौरा करून १०७ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा करतील काय?," असा प्रश्नही गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थित केला.
बिलं काढण्यासाठी दावा
"नालेसफाईचे पालिकेच्या सत्ताधारी आणि प्रशासनाकडून करण्यात आलेले दावे फोल आहेत. अनेक ठिकाणी गाळ तसाच पडून आहे. काही ठिकाणी तर नाल्यावर जलपर्णी उगवली आहे. त्यामुळे महापालिका १०० टक्क्यांचा दावा कसा करु शकते? कंत्राटदारांकडून बिलं काढण्यासाठी दावा केला जातोय पण स्थायी समिती आणि महपौर पण असे दावे करीत असतील तर हे त्यांचे निव्वळ पाप आहे," असं शेलार यावेळी म्हणाले.
"याला जबाबदार महापालिका प्रशासन ही आहे. वेलारसू नावाचा एक राक्षस या शहरात फिरत असून त्यांनी केलेले फोल दावे आहेत. वेलारसू यांनी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ रचला आहे. हे दावे करणाऱ्या वेलारसू आणि त्याचे समर्थन करणारे महापौर आणि स्थायी समिती यांना आम्ही मुंबईकरांसमोर उघडे करु. यांच्या घरासमोर आम्ही गाळ नेऊन टाकू. हे वेलारसू कोण आहेत, कुणाचे काम करतात, कुणाला भेटतात हे सगळे उघड करु. नालेसफाईच्या कामात जे कंत्राटदार दोषी आहेत. त्यांचा संबंध वाझे प्रकरणाशी आहे," त्यांनी नमूद केलं. "सचिन वाझे यांनी न्यायालयाला दिलेल्या पत्रात नालेसफाईच्या कामातील कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी वसूल करायला मंत्र्यांनी सांगितले होते. अशी माहिती उघड केली होती. या दोषी कंत्राटदारांना वाचवण्याचे काम शिवसेनेचे मंत्री करीत आहेत, याचेही उत्तर शिवसेनेने द्यावे," असंही शेलार यावेळी म्हणाले.