मुंबई: कफ परेड ते आरे या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरील आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पावसाचे पाणी शिरून नुकसान झाल्याचा प्रकार ताजा असतानाच आता बीकेसी आणि वरळी मेट्रो स्थानकात जागोजागी गळती होत आहे. काही ठिकाणी भिंतींना ओलावा, तर काही भागात छतातून गळती होत असल्याचे दिसत आहे.
वरळी मेट्रो स्थानकात चार भागात पाण्याची गळती होत असल्याचे दिसले. यापूर्वी एमएमआरसीने गळती होत असलेल्या ठिकाणी पाण्याच्या बादल्या ठेवल्या होत्या. त्यामुळे एमएमआरसीवर टीका झाली होती. आता गळती होत असलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून सतत पाणी पुसण्याचे काम केले जात आहे. बीकेसी मेट्रो स्थानकातील पाणी गळती होत असलेल्या भाग मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मंगळवारी दोऱ्यांच्या साहाय्याने संरक्षित केला होता. काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी त्याची छायाचित्रे समाजमाध्यमातून प्रसारित केली होती.
मुंबईची ॲक्वा मार्गिका पाऊस नसतानाही नावाला जागत आहे. यापूर्वी आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पाणी शिरले. एमएमआरसीने काही स्थानकांचे प्रवेशद्वार ताडपत्रीने झाकून ठेवले होते. आता बीकेसी येथील मेट्रोचे छत सतत गळत आहे. या निकृष्ट कामासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर काही कारवाई केली का? असा सवाल, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
पाणी गळतीचे फोटो काढण्यास मनाईमेट्रो स्थानकावरील पाणी गळतीचे फोटो काढण्यास कर्मचाऱ्यांकडून मनाई केली जात आहे. तसेच काढलेले फोटो डिलीट करण्यास सांगितले जात आहे. स्थानकावर चित्रीकरणासाठी मनाई, असा फलक लावला आहे. पहिल्यांदा गळती झाली तेव्हाही माध्यमांना आत जाऊ दिले नव्हते. आता फाेटाे काढले तर डिलीट केले जात आहेत.
एमएमआरसी म्हणते...एमएमआरसीसाठी हा पावसाळा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर प्रत्यक्ष चाचणीचा काळ आहे. काही ठिकाणी किरकोळ समस्या उद्भवत आहेत. त्या दुरुस्त करण्यासाठी कंत्राटदारांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. हे काम संपूर्ण पावसाळ्यात सुरूच राहील. सर्वच ठिकाणी पाणी थेंबथेंबाने गळणे म्हणजे कामात त्रुटी असेल असे नाही. काही स्थानकांवर प्रवाशांच्या ये-जा करण्यासाठी मोठ्या मोकळ्या जागा, एअर वेंट्स आणि वातानुकूलनासाठी डक्ट्स ठेवले आहेत. जोरदार पावसात आणि वाऱ्यातून वा उघड्या भागांतून पावसाचे पाणी आत येऊन एखाद्या ठिकाणी थेंब पडू शकतात. अशा प्रकारच्या घटना संपूर्ण २२ किलोमीटरच्या मेट्रो मार्गात केवळ काही ठिकाणीच आढळतात. अधिक आर्द्रतेमुळे वातानुकूलनामुळे पाण्याचे थेंब पडणे हेही सामान्य आहे, असे एमएमआरसीने म्हटले आहे. हे प्रकार म्हणजे पाणी साचून पूरसदृश परिस्थिती झाली आहे, असे नसल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.