Join us

शिक्षकांना आणखी एक शाळाबाह्य काम, शिक्षण विभागाचा नवीन आदेश काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 10:04 IST

Primary Teacher Maharashtra news: केंद्र सरकारने निरक्षरांना साक्षर करण्यासाठी उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम उपक्रम सुरू केला आहे. यात निरक्षरांचे सर्वेक्षण केले जाते आणि त्यानंतर त्यांना शिकवले जाते.

मुंबई : नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण संचालकांनी (योजना) नुकतीच सूचना जारी केली आहे. परंतु शिक्षकांकडे अनेक प्रकारची कामे असताना शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबरोबर आता निरक्षरांचे सर्वेक्षण करायचे कसे, असा प्रश्न शिक्षक संघटनांनी उपस्थित केला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

केंद्र शासनाने निरक्षरांना साक्षर करण्यासाठी उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी निरक्षरांचे सर्वेक्षण केले जाते आणि त्यानंतर त्यांना साक्षर केले जाते. याबाबत ९ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्राच्या शिक्षण संचालनालयाने (योजना) शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाबरोबरच आता निरक्षरांही सर्वेक्षण करण्याचे आदेश काढले आहेत. 

शिक्षकांना निरक्षर व्यक्तींची नोंदणी उल्लास मोबाइल ॲपवर करायची आहे. शिवाय, अध्यापनही करायचे आहे. राज्यातील सर्व शाळांनी दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण आणि शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण याबरोबरच निरक्षरांचे सर्वेक्षण करावे, असे सूचनेत म्हटले आहे. 

शिक्षकांना अशैक्षणिक कामे 

अशैक्षणिक कामे कोणती याची माहिती २३ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयात दिली आहे. तरीही शिक्षकांना अध्यापनाऐवजी इतर कामात गुंतवले जाते, असे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीने म्हटले आहे.

पाचवी, आठवीच्या अनुत्तीर्णांची परीक्षा घ्यायची कधी?

पाचवी आणि आठवीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे शासन निर्देश असल्याने या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या कधी, असा नवा पेच शिक्षकांपुढे आहे. 

शिक्षण विभागाने यंदा राज्यभरात एकसमान परीक्षा वेळापत्रक जारी केल्याने ८ ते २५ एप्रिल या कालावधीत पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा घेतल्या जात आहेत. २५ एप्रिलला परीक्षा संपल्यावर अवघ्या पाच दिवसांत १ कोटी १७ लाख विद्यार्थ्यांचा निकालही द्यायचा आहे. 

पाचवी, आठवीत जी मुले अनुत्तीर्ण होतील, त्यांच्या परीक्षा, त्यांच्यासाठी स्वतंत्र वर्ग घेणे, उपचारात्मक अध्ययन करणे ही सर्व कामे कधी करायची? अनेक योजना अंमलबजावणीसाठी शिक्षकांवर लादल्या जात आहेत. नेमके शिक्षकांनी करायचे काय? विकास कोणाचा साधायचा. असा प्रश्न महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष  विजय कोंबे यांनी उपस्थित केला आहे. 

कोणतेही वेगळे काम दिलेले नाही : शिक्षण संचालक 

शिक्षकांना कोणतेही वेगळे काम करावे लागणार नाही. दरवर्षी शाळेत कोणते विद्यार्थी दाखल करून घ्यावेत, याबाबतचे दाखलपात्र विद्यार्थी सर्वेक्षण आणि शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण हे नियमित होतच असते. त्यासोबतच असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यासाठी सूचना जारी केल्या आहेत, अशी माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

आता परीक्षा  सुरू आहे. दहावी आणि बारावीचे पेपर तपासणीचे काम प्रचंड आहे. त्यात निपुण भारत उपक्रम, याशिवाय शालेय कामकाज आणि शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षणाबरोबर  हे निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करायचे. मग विद्यार्थ्यांकडे लक्ष केव्हा द्यायचे? -तानाजी कांबळे (अध्यक्ष, पुरोगामी शिक्षक संघटना)

टॅग्स :शिक्षकशिक्षणशाळाशिक्षण क्षेत्रविद्यार्थी