आदित्य ठाकरेंच्या 'Bangles' ट्विटला अमृता फडणवीसांचा 'Pun' रिप्लाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 15:01 IST2020-02-26T15:00:59+5:302020-02-26T15:01:19+5:30
फडणवीस ठाकरे वादात अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे

आदित्य ठाकरेंच्या 'Bangles' ट्विटला अमृता फडणवीसांचा 'Pun' रिप्लाय
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागलं आहे, हे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना अनेक आश्वासनं दिली होती. मात्र, शेतकऱ्यांचा विश्वासघात या सरकारने केला आहे. नुसत्या कर्जमाफीच्या घोषणा दिल्या पण पैसा दिला नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला. तर भाजपाने सरकारविरुद्ध आंदोलन पुकारले होते. त्यात, वारिस पठाण यांच्या विधानावरुन फडणवीस यांनी शिवसेनेला बांगड्या भरल्या असतील, असे म्हणत टोला लगावला होता.
फडणवीस यांनी भाजपच्या आंदोलनावेळी आझाद मैदानातील भाषणात शिवसेनेवर टीका केली होती. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करताना, शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील, आम्ही नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. शिवसेनेनं यावर अद्याप चुप्पी साधली होती. मात्र, आदित्य ठाकरेंनी फडणवीस यांच्या या विधानावरुन फडणवीस यांना लक्ष्य केलं. तसेच, या विधानाबद्दल माफी मागण्याचं आवाहनही केलं होतं. महिला या सर्वात शक्तिशाली असून त्या बांगड्या परिधान करतात. राजकारण हे चालतच राहते, पण ही मानसिकता बदलायला हवी, असे आदित्य यांनी फडणवीसांना उद्देशून म्हटले होते. आता, आदित्य ठाकरेंच्या या ट्विटला देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय.
A cocooned worm will never understand the ‘Pun’ of life ! It’s meant to thrive on the glory of the silken life woven for its comfort by its ancestors @AUThackeray ! Proud of ur struggles @Dev_Fadnavis & each and every hardworking member of @BJP4Maharashtra ! https://t.co/wshocfceIa
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 26, 2020
फडणवीस ठाकरे वादात अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कुठलिही राजकीय टीपण्णी न करणाऱ्या अमृता यांनी आदित्य ठाकरेंच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्या ''रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ कधीच समजणार नाही, पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते, असे म्हणत अमृता यांनी आदित्य ठाकरेंना सर्व आयतं मिळाल्याचं म्हटलंय. तर, देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.