Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 07:35 IST2025-06-21T07:33:40+5:302025-06-21T07:35:24+5:30

केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर टीका केली.

Amit Shah Slams Congress Over Maharashtra and Mumbai | Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका

Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची चर्चा देशात व्हायची. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात सात लाख ८२ हजार कोटी निधी महाराष्ट्राला दिला. विदर्भ व मराठवाड्यातील दुष्काळी भागात गुंतवणूक करून, सिंचन क्षेत्रात गुंतवणूक वाढवून शेतकरी आत्महत्या रोखल्या. तुमच्याकडे इतकी वर्षे महाराष्ट्र होता, तेव्हा तुम्ही मुंबईसाठी काय केले? समस्यांच्या मुळाशी जाऊन काम करतो तेव्हा असा निकाल दिसतो, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी विरोधकांवर केली.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन शाह यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. शतक महोत्सवी वर्षानिमित्त एमएसीसीआयएच्या नव्या प्रतीक चिन्हाचे अनावरण आणि राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

महाराष्ट्र चेंबर्स आपले महत्त्व टिकवून खरी शिवसेना कुणाची याचा परिचय करून दिला ते माझे साथी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. देशाची व समाजाची काळजी करून स्वार्थ न बाळगता एखादी गोष्ट सुरू केल्यास त्याला ईश्वराचा आशीर्वाद मिळतो.

देशभरात अनेक चेंबर्स असल्या तरी महाराष्ट्र चेंबर्स आपले महत्त्व टिकवून आहे. १०० वर्षांत देशातील व्यापार, उद्योग व शेतीत आमुलाग्र बदल झाला. देशातील योजनाही बदलल्या. जगात होणाऱ्या युद्धाचे परिणाम भारतावरही होतात. मात्र, अशा परिस्थितीतही जागतिक अर्थव्यवस्थेत भारताने इतर देशांना मागे टाकून चौथ्या स्थानी झेप घेतली आहे, असे त्यांनी सांगितले.

कृषी क्षेत्राला उभारी देणार
राज्यातील उद्योजक व व्यापाऱ्यांनी मिळून महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणले. त्यामुळे राज्य सरकार व चेंबर्सने विविध पॉलिसीवर एकत्र काम केले पाहिजे. गुंतवणूक आणि व्यापार यांच्या माध्यमातून शेती क्षेत्राला नवीन उभारी कशी देता येईल यासाठी काम करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग, सहकार धोरण ठरवताना महाराष्ट्र चेंबरचे मत विचारात घेऊन महाराष्ट्राचा मेक ओव्हर करू, असे सांगितले.

मुंबईचा चेहरा बदलला
वाढती लोकसंख्या, जुनी घरे, झोपडपट्टी, वाहतूक कोंडीमुळे मुंबईचे काय होणार याची भीती होती. पण, मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मोदी सरकारने मोठा निधी दिला. भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्यांकडे असे प्रकल्प आखण्याची दृष्टी आहे का? यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने मुंबईला तिच्या नशिबावर सोडले होते, अशी टीका शाह यांनी केली.

Web Title: Amit Shah Slams Congress Over Maharashtra and Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.