उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार; भाजपा आमदाराचं सूचक वक्तव्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 15:41 IST2022-07-03T15:35:22+5:302022-07-03T15:41:01+5:30
भरत गोगावले यांनी दिलेल्या पत्रानंतर भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार; भाजपा आमदाराचं सूचक वक्तव्य!
मुंबई- महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. ते राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत.
शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त १६४ मतं मिळाली. तर राजन साळवी यांना १०७ मतं मिळाली. समाजवादी पक्ष आणि एआयएमचे आमदार या मतदानात तटस्थ राहिले. एकूण तीन आमदार तटस्थ राहिले. अशा पद्धतीनं नार्वेकर मोठ्या मतांनी विजयी झाले.
शिंदे गटाकडून प्रतोद भरत गोगावले यांनी व्हिपविरोधात मतदान करणाऱ्या १६ आमदारांविरोधात (ठाकरे गटातील) तक्रार दाखल केली आहे. शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिण्यात आले आहे. अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात भरत गोगावले यांचा शिवसेनेचे प्रतोद असा उल्लेख करण्यात आला.
भरत गोगावले यांनी दिलेल्या पत्रानंतर भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या १६ आमदारांवर कधीही कारवाई होऊ शकते, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंचा ३९ जणांचा गट असल्याचं घोषित केलं आहे, असं प्रसाद लाड म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ३९ आमदारांनी व्हिप न पाळल्यामुळे राजन साळवी यांचा पराभव झाला. उपाध्यक्ष असताना निवडणूक झाली आणि त्याच वेळी आम्ही पत्र दिले आहे. त्यानंतर भरत गोगावलेंनी नव्या अध्यक्षांना पत्र दिल्याने मला वाटत नाही की त्या पत्राला काही अर्थ असेल, असे सुनील प्रभू म्हणाले.