“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:03 IST2025-06-04T15:59:52+5:302025-06-04T16:03:27+5:30

Aaditya Thackeray News: लोकांच्या मनात काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. महाराष्ट्र हितासाठी लढत राहू, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

aaditya thackeray big statement on mns and uddhav thackeray alliance | “आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान

“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान

Aaditya Thackeray News: दिवाळीनंतर महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता असल्याने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांनीही मतदारांना आकृष्ट करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. यातच मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क लढवले जात असतानाच उद्धवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सूचक विधान केले आहे. 

पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिला आहे. आमची भावना व्यक्त केली आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्यासोबत यायला तयार असेल, त्यांना आम्ही बरोबर घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. अलीकडेच आमचे नेते दीपेश म्हात्रे व मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकत्र येऊन आंदोलन केले. हे त्याचेच उदाहरण आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आमचे मन साफ आहे. जो कोणी नेता महाराष्ट्र हितासाठी आमच्याबरोबर यायला तयार असेल, जो पक्ष पुढे येत असेल, आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र येऊन लढू, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले. 

तुमच्या सर्वांच्या मनातली बातमी तुम्हाला लवकरच कळेल

संजय राऊत यांनीही पत्रकारांशी बोलताना मनसे आणि ठाकरे गटाच्या संभाव्य युतीबाबत प्रतिक्रिया दिली. युतीच्या चर्चेवर कोणीही मौन बाळगलेले नाही. स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातली इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी नव्हे. राज ठाकरे यांच्या इच्छेवर त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांनी अनुकूल भूमिका घेतली आहे. त्यानंतर आम्ही सर्वांनी योग्य भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या मनातली बातमी तुम्हाला लवकरच कळेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, माझ्या माहितीप्रमाणे अद्याप कोणताही प्रस्ताव मनसेकडे आलेला नाही. जर प्रस्ताव आला, तर त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील. आम्ही सकारात्मक आहोत, हे केवळ बोलून चालणार नाही, खरेच सकारात्मक असतील, तर त्याबाबतची ठोस कृती करायला हवी. कृती कुठेही दिसत नाही. नुसती बोलाची कढी अन् बोलाचा भात असे सुरू आहे. प्रत्यक्ष कृती होताना दिसत नाही. कृती झाली तर राज ठाकरे निर्णय घेतील. ठाकरे ब्रँड संपवायचा कुणीही प्रयत्न केला, तरी जोपर्यंत राज ठाकरे आहेत, तोपर्यंत ठाकरे ब्रँड संपवू शकत नाही, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले होते. 

 

Web Title: aaditya thackeray big statement on mns and uddhav thackeray alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.