थर्टी फर्स्टच्या पार्टीत ४८ वार अन् जान्हवीचा अंत; मुख्य आरोपी जोगधनकरला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 13:15 IST2026-02-01T13:14:42+5:302026-02-01T13:15:48+5:30
Janhvi Kukreja Murder Case: मुंबईतील गाजलेल्या जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. १ जानेवारी २०२१ च्या पहाटे खारमधील पार्टीत झालेल्या या निर्घृण हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी श्री जोगधनकर याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

थर्टी फर्स्टच्या पार्टीत ४८ वार अन् जान्हवीचा अंत; मुख्य आरोपी जोगधनकरला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: १९ वर्षीय जान्हवी कुकरेजा हिच्या हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी श्री जोगधनकर याला शनिवारी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याला २५ हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले, तर सहआरोपी दिया पडळकर हिची संशयाचा फायदा देत सुटका केली. २०२१ च्या नववर्षसंध्येच्या पार्टीदरम्यान झालेल्या झटापटीनंतर जान्हवीची हत्या करण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी भारतीय दंड संहितेतील संबंधित तरतुदींअंतर्गत जोगधनकरला खूनप्रकरणी दोषी ठरविले.
जान्हवी कुकरेजा ही मानसशास्त्राची विद्यार्थिनी होती. ती ३१ डिसेंबर २०२० रोजी खार येथील भगवती हाइट्स इमारतीत आयोजित नववर्षसंध्येच्या पार्टीला हजर होती. दरम्यान, १ जानेवारी २०२१ रोजी पहाटे इमारतीतील जिन्याजवळ ती रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळली. शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर तब्बल ४८ जखमा आढळून आल्या. पोलिसांनी पार्टीत उपस्थित असलेला श्री जोगधनकर आणि दिया पडळकर या दोघांना अटक केली. पडळकर व जान्हवी एकाच परिसरात लहानाच्या मोठ्या झाल्या. पोलिसांनी असा आरोप केला होता की, जोगधनकर आणि पडळकर यांनी इमारतीच्या टेरेसवर जान्हवीवर हल्ला करून तिची हत्या केली आणि नंतर तिला पाचव्या मजल्यावरून जिन्याने खाली ओढले.
हत्या का झाली?
पोलिसांच्या मते, जोगधनकर आणि पडळकर यांच्यातील कथित जवळकीवरून वाद झाला आणि त्यातून ही झटापट झाली. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, डीएनए पुराव्यांमधून जोगधनकरची गुन्ह्याच्या ठिकाणी उपस्थिती स्पष्ट होते, तसेच पडळकरच्या घटनेनंतर ती ज्या फ्लॅटमध्ये थांबली होती, तेथील रक्ताने माखलेल्या वस्तू सापडल्याचे निष्पन्न झाले आहे.
बचाव पक्षाचे म्हणणे काय?
दरम्यान, बचाव पक्षाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद बाजू फेटाळून लावत संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित असल्याचा युक्तिवाद केला होता. दोष सिद्ध होण्यासाठी आवश्यक असलेली पुराव्यांची साखळी सरकारी वकील कुठल्याही पद्धतीने सादर किंवा सिद्ध करू शकले नाहीत, असा युक्तिवाद बचावपक्षाद्वारे सुनावणीदरम्यान करण्यात आला.