Join us  

शेंड्या लावता का आम्हाला? ‘मन झालं बाजिंद’ मालिका पुन्हा झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2021 3:11 PM

Man Zhala Bajind : होय, ‘मन झालं बाजिंद’ ही मालिका सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतेय. कारण काय तर मालिकेतील घोडचूक.

टीव्हीवरच्या मालिका म्हणजे, गृहिणींच्या जिव्हाळ्याचा विषय. अनेक मालिका येतात आणि येताच हिट होतात, ते याचमुळे. साहजिकच, या मालिकांची चर्चा सोशल मीडियावरही होते. सध्या अशाच एका मालिकेची चर्चा सोशल मीडियावर रंगलीये. अर्थात एका वेगळ्या कारणानं. होय, ‘मन झालं बाजिंद’ ही मालिका सध्या सोशल मीडियावर ट्रोल होतेय. कारण काय तर मालिकेतील घोडचूक. याआधीही ही मालिका अशीच ट्रोल झाली होती.गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. पण ‘मन झालं बाजिंद’  (Man Zhala Bajind) या मालिकेत पहिल्यांदाच प्रेमाचा रंग पिवळा दाखवण्यात आला आहे. यामुळे ही मालिका तशीही चर्चेत आहे. आता  मालिकेत अशी एक चूक झाली की, तिची चर्चा सोशल मीडियावरही झाली.

कृष्णा बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्या डोक्याला उजव्या बाजूला दुखापत झालेली दाखवण्यात आली होती. पण तीच कृष्णा शुद्धीवर आल्यावर तिच्या डोक्याच्या डाव्या बाजूला जखम दाखवण्यात आली होती. नेटक-यांनी नेमकी हीच चूक हेरली आणि मालिका ट्रोल झाली. यावरचे अनेक मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.

या मालिकेत आता कुठे हळूहळू राया आणि कृष्णा यांच्यातील प्रेम फुलू लागलं आहे. परंतु, कृष्णावर येणारी संकट मात्र जराही कमी झालेली नाहीत. लग्नाच्याच दिवशी कृष्णावर मोठं संकट कोसळलं होतं. या अपघातातून कृष्णा थोडक्यात बचावली होती.

मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी अशी कृष्णा यांच्या बाजिंद्या प्रेमाची ही गोष्ट आहे. 

राया आणि कृष्णा एकमेकांना आपल्या आयुष्यभराच्या जोडीदाराच्या रूपात बघत नाहीयेत, पण रायाच्या पत्रिकेत दोष असल्यामुळे त्याची पहिली बायको ही अल्पायुषी असेल असं भाकीत गुरुजींनी केलं. त्यामुळे गुली मावशी राया आणि कृष्णाचं लग्न लावण्यासाठी मामाला भरीस पाडते आणि दोघांच लग्न होतं.राया आणि कृष्णाच्या गाडीला अपघात झाल्यावर, बेशुद्ध कृष्णाला राया स्वत: श्वास देऊन वाचवतो. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि राया कृष्णाचं घर जप्तीपासून वाचवतो आणि कृष्णाला घेऊन आपल्या घरी येतो. त्याचवेळी तिथून निघण्याचा कृष्णा प्रयत्न करते, पण सासरच्यांच्या आग्रहापोटी तिला तिथे रहावं लागतं. त्यातच भाऊसाहेब आणि फुई, राया आणि कृष्णाच्या हनिमूनचा प्लॅन आखतात. राया आणि कृष्णा कोकणात एका ठिकाणी हनिमूनसाठी रवाना होतात.या सर्व गोष्टींमुळे नकळत का होईना दोघांमधील नवरा बायकोचं नातं खुलताना दिसतंय.

टॅग्स :झी मराठी