Join us  

‘लागीरं झालं जी’ या मालिकेत अंजिक्य काय घेणार निर्णय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:31 PM

अजिंक्यच्या संपूर्ण ट्रेनिंग आणि कसम परेड नंतर आता वेळ आली आहे ती म्हणजे अजिंक्यच्या पोस्टिंगची. आता अजिंक्य काय निर्णय घेणार हे मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

लाखात एक आपला फौजी असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या एका वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत प्रेक्षकांना आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला आहे. आर्मीचं प्रशिक्षण घेण्यासाठी नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतो. तेवढाच कालावधी अजिंक्यच्या जडणघडणीसाठी मालिकेमध्ये लागला आहे तर नऊ दहा महिन्याचं आर्मी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मुलं देशसेवेची शपथ घेतात आणि खऱ्या अर्थाने फौजी बनतात. अजिंक्यच्या संपूर्ण ट्रेनिंग आणि कसम परेड नंतर आता वेळ आली आहे ती म्हणजे अजिंक्यच्या पोस्टिंगची.लग्न झाल्यानंतर आता अजिंक्यला पोस्टिंगचं पत्र आलं आहे. त्याच्या कामावर रुजू होण्याच्या सर्व लगबगीमध्ये सर्वांना एक धक्कादायक बातमी समोर येणार आहे, ती म्हणजे विक्रम शहीद झाल्याची. या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसणार असून अजिंक्य तर पुरता हादरून जाणार आहे. विक्रम शहिद झाल्यामुळे अजिंक्यच्या डोक्यात विचित्र विचारांचं काहूर माजणार आहे. त्याचे पोस्टिंगच्या तयारीत असलेलं पाऊल अचानक अडखळणार आहे. नुकतंच झालेलं लग्न, नवीन संसार त्याच्यावर असलेली शीतलची जबाबदारी या सगळ्या गोष्टींचा विचार करून, शीतलचा विचार करुन पोस्टिंगसाठी जावं की नको हा पेच त्याच्यासमोर आता निर्माण होतो.अजिंक्य त्याच्या कामावर रुजू होण्याचा निर्णय बदलेल का? अशा प्रसंगात शीतल अजिंक्यची साथ कशी देईल? हे प्रेक्षकांना रविवार २२ जुलै रोजी प्रसारित होणाऱ्या १ तासाच्या विशेष भागात पाहायला मिळणार आहे.‘लागीरं झालं जी’ या मालिकेत शीतल ही भूमिका अभिनेत्री शिवानी बोरकर साकारत आहे तर या मालिकेत अजिंक्यच्या भूमिकेत नितीश चव्हाण आहे. या मालिकेतील ही जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे.लागिरं झालं जी या मालिकेने छोट्या पडद्यावर एंट्री करताच अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली. 

टॅग्स :लागिरं झालं जीनितीश चव्हाण