'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag Serial) मालिकेतील पूर्णा आजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर (Jyoti Chandekar) यांचं १६ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मालिकेतील कलाकार आणि चाहत्यांना खूप धक्का बसला. त्यांच्या एक्झिटनंतर मालिकेत पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार, असा प्रश्न अनेकांना पडला. काहींनी तर पूर्णा आजीच्या भूमिकेत दुसऱ्या कलाकारांना घेऊ नका, अशी विनंती केली. मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना या रिप्लेसमेंटवर सविस्तर चर्चा करुन कथेची गरज लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. दरम्यान आता मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता अमित भानुशाली(Amit Bhanushali)ने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ठरलं तर मग मालिकेचे ९०० भाग पूर्ण झाल्यामुळे अमित भानुशालीने इंस्टाग्राम लाइव्हवर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी नेटकऱ्यांनी अभिनेत्याला पूर्णी आजीची रिप्लेसमेंट कोण करणार आहे, असा सवाला केला. त्यावर अभिनेता म्हणाला की, तुम्हाला खरं सांगतो. अजूनपर्यंत आम्ही कोणीच याचा विचार केला नाही. आम्ही कोणीच या धक्क्यातून अद्याप सावरलेलो नाही. त्यामुळे पुढे निर्णय काय घ्यायचा हे वरिष्ठ मंडळी, चॅनेल आणि प्रोडक्शन टीम ठरवतील. पण आम्ही कोणीच कधीच पूर्णा आजीला विसरणार नाही आणि तिची जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही.
''आम्ही तिला कधीच विसरु शकत नाही...''
अमित भानुशाली पुढे म्हणाला की, आमच्यासोबत पूर्णा आजी आहेत आणि कायम राहतील. त्या कधीच कुठेही गेल्या नाहीत. सेटवर येताना ती बास्केट भरून खाऊ आणायची. पुण्याहून येताना खास क्रिम रोल आणायची. ती सगळ्यांसाठी खाऊ घेऊन यायची आणि तिला गोड खूप आवडायचे. तिच्या असंख्य आठवणी आहेत. त्यामुळे आम्ही तिला कधीच विसरु शकत नाही.
दिग्दर्शक म्हणाले....
पूर्णा आजीची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही आणि आम्ही तिला कधीच विसरु शकत नाही. पण ही एक मालिका आहे. त्यामुळे त्याबद्दल मालिकेच्या कथानकानुसार विचार केला जाईल. आम्हाला लवकरच जो काही निर्णय असेल तो कळेल, असे ठरलं तर मगचे दिग्दर्शक सचिन गोखले म्हणाले.