Join us  

खुशखबर...! अखेर 'तुझ्यात जीव रंगला' मालिका बंद होण्याच्या चर्चेला लागला पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 5:28 PM

मनोरंजनाच्या समीकरणात बदल झाल्याचं झी मराठीनं व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे प्रेक्षक नाराज झाले होते. मात्र आता झी मराठी वाहिनीने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून समजतंय की, 'तुझ्यात जीव रंगला' मालिका बंद होणार नसून प्रसारीत होण्याची वेळ बदलण्यात आला आहे. 

तुझ्यात जीव रंगला ही मालिका ज्यावेळी प्रसारित होते त्याचवेळी एक नवी मालिका सुरु होत असल्याच्या जाहिराती सुरू झाल्या आहेत. त्यामुळे तुझ्यात जीव रंगला मालिका बंद होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. 

तुझ्यात जीव रंगला मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं अद्याप अधिकृतरित्या वाहिनीनं जाहीर केलेलं नव्हतं. मात्र या वेळेत म्हणजेच सायंकाळी ७.३० वाजता लग्नाची वाईफ वेडिंगची बायकु ही मालिका लवकरच प्रसारीत होणार आहे. झी मराठीवर नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ही नवीन मालिका २१ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचंही त्यामध्ये सांगितले जात आहे. त्यामुळे तुझ्यात जीव रंगला ही मालिका लवकरच निरोप घेणार की काय, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता.  

झी मराठी वाहिनीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि ब्रेकिंग न्यूज असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओत तुझ्यात जीव रंगला मालिकेचा टाईम सायंकाळी ७.३० ऐवजी सायंकाळी ६.३० करण्यात आला आहे. या मालिकेसोबत होम मिनिस्टर या शोच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगला तीन वर्षांपूर्वी म्हणजेच ३ ऑक्टोबर, २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. या मालिकेतील राणादा उर्फ हार्दिक जोशी, पाठक बाई उर्फ अक्षया देवधर, गोदाक्का उर्फ छाया सानगावकर, नंदिता उर्फ धनश्री काडगांवकर, बरकत उर्फ अमोल नाईक या सगळ्या कलाकारांनी रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. 

टॅग्स :तुझ्यात जीव रंगलाझी मराठीहोम मिनिस्टर