Join us  

तू तेव्हा तशी: वल्लीने आखला मोठा प्लॅन; सौरभला सोडावे लागणार वाड्यावरचे हक्क?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 6:50 PM

tu teva tashi: सौरभचं लग्न होणार या विचारानेच वल्लीला प्रचंड टेन्शन येतं. त्यामुळे त्याचं लग्न होऊ नये यासाठी ती कसोशीने प्रयत्न करते.

अभिनेता स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांची मुख्य भूमिका असलेली तू तेव्हा तशी ही मालिका अलिकडेच सुरु झाली आहे. मात्र, ही मालिका सुरु झाल्यानंतर अवघ्या काही भागांमध्येच लोकप्रिय झाली. या मालिकेतील सौरभ, अनामिका आणि वल्ली ही पात्र प्रेक्षकांना विशेष आवडू लागली आहेत. यामध्येच आता मालिकेत नवनवीन ट्विस्ट येण्यास सुरुवात झाली आहे.

सध्या या मालिकेत सौरभ राहात असलेल्या वाड्यात रामनवमीची गडबड सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. सौरभच्या वाड्यात रामनवमीचा मोठा कार्यक्रम केला जाणार आहे. या कार्यक्रमाला अनामिकाला देखील बोलावणं आलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अनामिका आल्यानंतर अनेक जण तिला सौरभची बायको असल्याचं समजतात. तर मावशीही सौरभला लग्न करण्याचा आग्रह करते.

दरम्यान, सौरभचं लग्न होणार या विचारानेच वल्लीला प्रचंड टेन्शन येतं. त्यामुळे त्याचं लग्न होऊ नये यासाठी ती कसोशीने प्रयत्न करते. इतकंच नाही तर सौरभने लग्न केलं तर तो वाड्यावरचा हक्कं सोडून देईल असा मजकूर असलेले कागदपत्रही तयार करते. विशेष म्हणजे या कागदपत्रांवर ती सौरभची सहीदेखील घेते. त्यामुळे आता वल्लीच्या या प्लॅनमुळे सौरभला वाडा सोडावा लागतो का? या मालिकेत नेमकं काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार