Join us  

सुंदर असण्याचा आणि वजनाचा काय संबंध? ‘सुंदरा मनामध्ये भरली’च्या लतिकाची ‘धाकड’ पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 10:37 AM

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील लतिकाची भूमिका साकारणा-या अक्षया नाईकनेही एक पोस्ट करत बॉडी शेमिंग करणा-यांना सणसणीत चपराक दिली आहे.

ठळक मुद्दे सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत लतिकाच्या भूमिकेत असलेली अक्षया नाईक प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. अक्षयाने या मालिकेच्याआधी ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत देखील काम केले होते. तसेच फिट इंडिया या चित्रपटात देखील ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

ग्लॅमर इंडस्ट्रीत हिरोईनचे वजन हा मोठा संवेदनशील विषय. करिनाने झिरो फिगरचा ट्रेंड आणला आणि यानंतर तर नट्या वजनाबद्दल कमालीच्या काटेकोर झाल्यात. ग्लॅमर इंडस्ट्रीतील अभिनेत्रींचे सोडा पुढे सर्वसामान्य मुलीही वजनाबद्दल नको इतक्या काळजी घेऊ लागल्या. इतक्या की, सुंदर फिगर हेच सुंदरतेचे माप बनले. समाजाची दृष्टी अचानक इतकी काही बदलली की, लठ्ठ मुलींना, काहीशा गुटगुटीत हिरोईन्सला बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले. अगदी सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, हुमा कुरेशी या बॉलिवूडच्या अभिनेत्री बॉडी शेमिंंगच्या बळी पडल्या. पण या अभिनेत्रींनी ‘बॉडी शेमिंग’ अर्थात वजनावरून हिणवणा-यांच्या  तोंडावर जोरदार चपराक मारण्याची हिंमत दाखवली. आता ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharali) या मालिकेतील लतिकाची भूमिका साकारणा-या अक्षया नाईकनेही ( Akshaya Naik) एक पोस्ट करत बॉडी शेमिंग (body shaming) करणा-यांना सणसणीत चपराक दिली आहे. 

कृपा करून एखाद्याला त्याच्या शरीरावरून ओळखणं बंद करा. त्यांच्या शरीरासोबत त्यांच्या भावनासुद्धा आहेत, त्यांचाही विचार करा, अशा शब्दांत तिने बॉडी शेमिंग करणा-यांना सुनावले आहे. अक्षयाने एक लांबलचक पोस्ट शेअर करत, वजनावरून मुलींना हिणावणा-यांचे कान टोचले आहेत. ती म्हणते...

‘ जास्त हेल्थी असणा-या मुली खरं तर खूप बिनधास्त असतात. त्या खूप मुक्तपणे जगत असतात. त्यांना वाढलेल्या वजनाचं मुळीचं आश्चर्य वाटतं नाही. उलट त्या खूपच आत्मविश्वासी असतात. स्वत:चे शरीर जसं आहे तसं त्या स्वीकारतात आणि मला ही लोकं खूप आवडतात.मी नेहमी जास्त वजनाबद्दल सकारात्मकच बोलत असते मात्र आज मी काही वैयक्तिक अनुभव सांगणार आहे आणि ते प्रत्येक जाड व्यक्तीवर लागू होतं. मला माहिती आहे, मी आत्मविश्वासी आहे, बिनधास्त आहे मात्र प्रत्येक व्यक्ती असेलच असं नाही. अनेक लोकं या प्रसंगातून जातात त्यांना आपल्या वजनावरून खूप काही सोसावं लागतं. आपण विचारही करू शकत नाही इतकं ते सहन करतात. माझ्यासारखे लोक प्रत्येकवेळी या समाजापासून स्वत:चं संरक्षण करत असतात. आम्हाला काही फरक नाही पडत, आम्ही जसे आहोत तसे आनंदी आहोत, असं असं म्हणून समाज काय म्हणतंय याकडे फारसं लक्ष देत नाहीत. आणि हे खरंच आहे आम्हाला माहिती आहे आम्ही किती सुंदर आहोत. मात्र प्रत्येकवेळी आम्हाला आमच्या जाड शरीरावरून नाकारलं जातं. आम्हाला अशी जाणीव करून दिली जाते की आम्ही सुंदर नाही. तू गुबगुबीत, जाड आहेस पण सुंदर आहेस, असे लोक मला येऊन म्हणतात तेव्हा मला हसू येतं. अहो, माझ्या सुंदर असण्याचा आणि वजनाचा काय संबंध? कृपा करून वजनावरून एखाद्याला जज करणे सोडा. कारण प्रत्येकाला भावना असतात़ त्या सुद्ध्द्धा जपायला शिका.’

टॅग्स :अक्षया नाईक