Join us  

स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेने घेतला निरोप! प्रेक्षक नाराज, म्हणाले- याच्यापेक्षा आई कुठे काय करते...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 12:52 PM

८ महिन्यांतच स्टार प्रवाहची मालिका संपली, प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजी

स्टार प्रवाह वाहिनीवरील अनेक मालिका सध्या लोकप्रिय ठरत आहेत. अशाच मालिकांपैकी एक म्हणजे 'कुन्या राजाची गं तू रानी' ही मालिका. या मालिकेतील कबीर आणि गुंजा या पात्रांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं. तर अल्पावधीतच या मालिकेनेही प्रेक्षकांच्या मनात घर केलं. पण, आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अवघ्या आठच महिन्यांत 'कुन्या राजाची गं तू रानी' या मालिकेला गाशा गुंडाळावा लागला आहे. पण, यामुळे प्रेक्षक नाराज आहेत. 

'कुन्या राजाची गं तू रानी' या मालिकेचा शेवटचा भाग शनिवारी(१६ मार्च) प्रसारित करण्यात आला. अखेर गुंजा आणि कबीरच्या लग्नाने त्यांची लव्हस्टोरी आणि मालिकेचाही गोड शेवट करण्यात आला. स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावरुन 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेबाबत एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये या मालिकेला दिलेल्या प्रेमासाठी प्रेक्षकांचं आभार मानण्यात आले आहेत. पण, चांगली मालिका लवकर संपवल्यामुळे या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

"आई कुठे काय करते ति सिरीयल संपवा आणि कुण्या राजाची ग तु राणी राहुदे", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "खूप लवकर मालिकेचा शेवट केला" असं म्हटलं आहे. "आई कुठे काय करतेची स्क्रिप्ट चेंज करा तेवढी डोकं तापवायची कामं", "का संपवली? भाग 2लवकर येऊ द्या खूप छान झाली मालिका, खूप खूप शुभेच्छा", "एवढ्या लवकर का संपवली?" अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

'कुन्या राजाची गं तू रानी' ही मालिका जुलै २०२३मध्ये सुरू झाली होती. १८ जुलैला या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. या मालिकेत शर्वरी जोग हिने गुंजा हे पात्र साकारलं. तर हर्षद अटकरी कबीरच्या भूमिकेत होता. समिधा गुरू, पूर्णिमा डे, नीता पेंडसे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. 

टॅग्स :स्टार प्रवाहआई कुठे काय करते मालिकाटिव्ही कलाकार