१२ मार्च १९९३चा मुंबईवर झालेल्या बाॅम्बस्फोटाचे पडसाद उमटणार छोट्या पडद्यावर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 10:51 IST
"शौर्य - गाथा अभिमानाची" या मालिकेची पुढची गोष्ट आहे, पोलीस अधिकारी राकेश मारिया आणि सुरेश वालिशेट्टी, यांनी १९९३ बॉम्बस्फोटाच्या ...
१२ मार्च १९९३चा मुंबईवर झालेल्या बाॅम्बस्फोटाचे पडसाद उमटणार छोट्या पडद्यावर !
"शौर्य - गाथा अभिमानाची" या मालिकेची पुढची गोष्ट आहे, पोलीस अधिकारी राकेश मारिया आणि सुरेश वालिशेट्टी, यांनी १९९३ बॉम्बस्फोटाच्या नंतर गुन्हेगारांना पकडताना दाखवलेले शौर्य. एखाद्या गुन्ह्याचा शोध घेताना, सर्वप्रथम गुन्हेगार कोण? हे शोधणं ज्याप्रमाणे महत्त्वाचं; त्याचबरोबर त्याला अटक होऊन त्यात शिक्षा होणेही महत्त्वाचे आहे. एखादा गुन्हा घडल्यांनंतर तो गुन्हा दाखल करणे, पंचनामे, साक्षीदार यासारख्या अनेक बारीकसारीक तपशील न्यायालयापुढे नीट मांडणे कागदपत्रे सादर करणे हे खूप महत्वाचे असते. निवृत्त सहाय्यक आयुक्त सुरेश वालिशेट्टी यांनी या प्रत्येक खटल्यात तपास अधिकारी म्हणून केलेली मेहनत ही वाखाणण्याजोगी आहे. या भीषण बॉम्बस्फोट मालिकांच्या वेळी गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त असताना, राकेश मारिया यांनी केलेल्या तपासामुळे आरोपींना देहदंडाची शिक्षा झाली. बॉम्बस्फोटासारख्या घटनेने सामान्य नागरिक आणि महाराष्ट्र पोलीस एकाच विचाराने सावरत होते कि, ज्यांनीही हे केलंय त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी कंबर कसली आणि शोधमोहिमेला लागले. मुख्य आरोपी टायगर मेमन पर्यंत जाऊन पोहोचले. पण बॉम्बस्फोटाच्या तपासाची ओपनिंग मुंबई पोलिसांना कुठून मिळाली? या केसच्या तपासाचा पहिला जनक कोण होता अश्या गुन्हेगारीच्या गुलदस्त्यात दडून राहिलेल्या अनेक प्रश्नांची उत्तर मुंबईतल्या मातब्बर पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळणार आहेत. त्याचबरोबर टायगर मेमन हा नक्की कोण होता? त्याने हे सर्व का केले? टायगर मेमन आणि दाऊदचा नक्की काय संबंध होता? ह्या गोष्टींचा व्यवस्थित उलगडा होईल. १९९३ साली घडलेले बॉम्बस्फोट आणि त्यानंतर झालेली जीवितहानी आजही आपण विसरलेलो नाही. १९९३ च्या बॉम्बस्फोटांनी मुंबई शहर बेचिराख करून सोडले होते. अनेकांनी आपले मित्र,नातेवाईक, जवळची व्यक्ती या हल्ल्यात गमावली. तेव्हा सामान्य नागरिक रस्त्यावर यायलासुद्धा घाबरत होते. ज्यांना याची झळ लागली त्यांच्यासाठी हा हल्ला मरणप्राय होता. त दुसरीकडे इतर लोक ज्यांना प्रत्यक्ष झळ लागली नव्हती, ती सर्वजण वृत्तपत्रं आणि वृत्त वाहिनींवर झालेला घटनेचा प्रादुर्भाव पाहून असुरक्षितेच्या भावनेने ग्रासलेले होते. जितका हा हल्ला अनपेक्षित आणि धक्कादायक लोकांसाठी होता; तितकाच तो महाराष्ट्र पोलिसांसाठीही होता.या हल्ल्याने सुरक्षिततेचे अनेक प्रश्न उभे केले होते. केवळ मुंबईच नव्हे तर अख्खा भारत हादरला होता. भारताची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे कोलमडून गेली होती. हा तपास अत्यंत महत्वाचा होता कारण अनेकांनी नाहक आपला प्राण गमावला होता. या बॉम्बस्फोटांमध्ये अनेकांचे अक्षरशः चिथडे चिथडे उडाले होते. मृतदेहांचे अवशेष गोळा करावे लागत होते आणि हे सर्व टायगर मेमन मुळे झाले होते . या अश्या गुन्हेगाऱ्यापर्यंत पोहचण्याचा मुंबई पोलिसांचा हा महत्वपूर्ण प्रवास छोट्या पडद्यावर उळगडण्यात येणार आहे.