Join us  

'मोठे Star आहोत असं काहींना वाटतं, पण...' ; मिलिंद गवळींनी टोचले मराठी कलाकारांचे कान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 12:53 PM

Milind gawali: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मिलिंद गवळी यांनी यावेळी इंडस्ट्रीतील कलाकारांविषयी भाष्य केलं आहे.

मिलिंद गवळी (milind gawali) हे नाव कोणत्याही मराठी प्रेक्षकासाठी नवीन नाही. अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेले मिलिंद गवळी सध्या आई कुठे काय करते या गाजलेल्या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. या मालिकेमुळे त्यांनी अपार लोकप्रियता मिळवली. त्यामुळे ते सुध्दा कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. इतकंच नाही तर सोशल मीडियावर पोस्ट करत ते अनेकदा त्यांच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफविषयी व्यक्त होत असतात.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मिलिंद गवळी यांनी यावेळी इंडस्ट्रीतील कलाकारांविषयी भाष्य केलं आहे. यात खासकरुन त्यांच्या वेळेत न येण्याविषयी त्यांनी परखडपणे मत मांडलं आहे.

नेमकं काय म्हणाले मिलिंद गवळी?

“वेळ” “time” Time waits for none. वेळ एकदा निघून गेली की ती परत कधी येत नाही, म्हणून वेळेचे महत्व जाणं खूप महत्त्वाचं आहे, स्वतःच्या वेळेपेक्षा दुसऱ्याच्या वेळेचे महत्त्व जाणणं अधिक महत्त्वाचं, खूपशा लोकांना इतरांच्या वेळेची कदर नसते, दिलेली वेळ न पाहणारे असंख्य लोकं आहेत. बरेचशा लोकांना जर उशीर झाला तर वाट बघणाऱ्यांची ते क्षमासुद्धा मागत नाहीत. बऱ्याचशा लोकांना हे माहितीच नसतं की सातत्याने उशीर करणं म्हणजे ते चूक आहे. कदाचित कधीतरी त्यांच्यावर ज्या वेळेला वेळ येईल, त्यावेळेला त्यांना वेळेचं महत्त्व कळेल.  मला वेळेत पोहोचायची सवय शाळेतच लागली होती, वेळेवर बस स्टॉपवर पोहोचलं नाही तर स्कूल बस निघून जायची. आणि शाळेत उशिरा पोहोचलं की कर्णिक टीचर, गोखले टीचर, वर्गीस प्रिन्सिपल वर्गाबाहेर उभा करायचे. आमच्या शाळेत बरीचशी मुलं लांबून लांबून दादरला वेळेत शाळेत पोहोचायची. पण सुबोध हळदणकर नावाचा आमचा मित्र अगदी जवळ राहायचा, दोन-चार बिल्डिंग सोडून तरी नेहमी उशीरा यायचा, मग दहावीनंतर भोसला मिलिटरी स्कूल, नाशिकला मी गेलो, तिथे कोणाला उशिरा यायची हिंमतच व्हायची नाही, उशिरा येईल त्याला रायफल घेऊन ग्राउंडवर दहा राऊंड मारायला लागायचे," असं मिलिंद गवळी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "कधी कधी तर crawling , ते पण रायफल घेऊन, गुडघे ढोपरं सगळी फुटायची. मला असं वाटतंय एवढा सगळा त्रास करून घेण्यापेक्षा, वेळेत पोहोचायला काय हरकत आहे. पण नाही काही लोकांना शिव्या खायची सवय असतेचं, मिलिटरीमध्ये असते ती शिस्त, आणि या आमच्या कलाक्षेत्रात काही लोकांमध्ये असते ती बेशिस्त, कुठेतरी चुकीचे शिक्षण घेऊन आलेली असतात. वेळेवर पोहोचणारे म्हणजे काही फार महत्त्वाची लोकं नाहीत. आपण उशिरा पोहोचलो म्हणजे आपण मोठे Star आहोत असं काहींना वाटतं किंवा काही तर चक्क आळशीच असतात.  पण खरं सांगू का वेळेत पोहोचायची एक वेगळी मजा असते, एक प्रकारची नशा असते, आपल्या कामाविषयीचा आदर असतो. उत्सुकता असते, वाट बघणाऱ्या माणसांविषयी प्रेम असतं, respect असतो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, विस्कळीत झालेल्या traffic, public transport यामुळे कधीतरी कोणीतरी उशिरा येऊ शकतो. पण सतत तेच कारण असू शकत नाही, आमच्याकडे गिरगांव,मालाड, कल्याणवरुन वेळेवर येणारी लोक आहेत. आणि सुबोध हळदणकर सारखी सुद्धा आहेतच. तर कोणी वेळेवर येवो न येवो आपण आपली वेळ पाळली पाहिजे.

दरम्यान, मिलिंद गवळी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून त्यांनी हिंदी, मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच रंगमंचावरही ते अनेक नाटकांमध्ये झळकले आहेत.

टॅग्स :मिलिंद गवळीआई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनमराठी अभिनेता