Join us  

"आयुष्यातून निघून गेलेली माणसं पुन्हा भेटावीत आणि...", कुशल बद्रिकेची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 1:17 PM

"एखादं नातं तेव्हाच टिकतं जेव्हा त्या नात्यातील व्यक्तींना...", कुशल बद्रिकेच्या पोस्टने वेधलं लक्ष

मराठी सिनेइंडस्ट्रीतील गुणी कलाकारांपैकी एक असलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये काम करून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 'चला हवा येऊ द्या' या शोमधून कुशलला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या शोमुळे तो घराघरात पोहोचला. अभिनयाची उत्तम जाण आणि अफलातून विनोद बुद्धीने प्रेक्षकांना हसवणाऱ्या कुशलचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. कुशल सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. 

अनेकदा नवीन प्रोजेक्टचे अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांना देत असतो. तर कधी वैयक्तिक आयुष्याबाबतही तो पोस्टद्वारे व्यक्त होताना दिसतो. कुशलच्या सोशल मीडिया पोस्ट या अनेकदा चर्चेचा विषय असतात. आतादेखील त्याच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कुशलने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने भावुक कॅप्शन दिलं आहे. कुशल म्हणतो, "कधी कधी आपल्या आयुष्यातून निघून गेलेली माणसं पुन्हा भेटावीत असं वाटत राहतं. पुढे निघून गेलेल्यांना हाक मारुन थांबवावसं वाटतं आणि मागे राहिलेल्यांसाठी इथे सावलीत थोडा वेळ थांबावसं वाटतं. पण हे फक्त आपल्यालाच वाटत असेल तर… ? एखादं नातं तेव्हाच टिकतं जेंव्हा त्या नात्यातील दोन्ही व्यक्तींना एकमेकांविषयी समान भावना असतात. म्हणून आपण चालत राहतो एखाद्याची हाक ऐकू येई पर्यंत आणि एखादा कुणीतरी सावलीत वाट बघताना दिसेपर्यंत." 

मराठीनंतर आता कुशल हिंदीमध्ये त्याची जादू दाखवत आहे. सोनी टीव्हीवरील 'मॅडनेस मचाऐंगे' या कॉमेडी शोमधून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोमध्ये मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीदेखील आहे. 

टॅग्स :कुशल बद्रिकेटिव्ही कलाकारचला हवा येऊ द्या