Join us  

'टॉप सेलिब्रिटींनाच फॉलो करायचं ठरवलंय का?'; कपिलच्या प्रश्नावर कार्तिक आर्यन क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 1:44 PM

Kartik aaryan: 'प्यार का पंचनामा' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या कार्तिकने आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत कायम आवर्जुन नाव घेतलं जाणारा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन (kartik aaryan). उत्तम अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर कार्तिक आर्यनने बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये त्याची कायमच चर्चा रंगत असते.  'प्यार का पंचनामा' या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या कार्तिकने आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे लवकरच तो 'धमाका' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने अलिकडेच 'द कपिल शर्मा शो' (the kapil sharma show ) या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी कपिलने विचारलेल्या एका प्रश्नामुळे कार्तिक क्लीन बोल्ड झाल्याचं पाहायला मिळालं.

'द कपिल शर्मा' शो या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार त्यांच्या चित्रपटांचं प्रमोशन करण्यासाठी आल्याचं पाहायला मिळालं आहे. यामध्येच कार्तिकदेखील अभिनेत्री अमृता सुभाष आणि मृणाल ठाकूर यांच्यासह त्याच्या धमाका चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आला होता. विशेष म्हणजे यावेळी कपिलने कार्तिकला त्याच्या यशस्वी वाटचालीविषयी काही प्रश्न विचारले. 

"काही वर्षांपूर्वी मी तीन पत्नी असलेला एक चित्रपट केला होता. त्यानंतर कार्तिकचा पती, पत्नी और वो हा चित्रपट प्रदर्शित झाला. मग मी नेटफ्लिक्सवर एक शो केला. त्यानंतर पुन्हा कार्तिकने एक चित्रपट केला...मला एक विचारायचं आहे. कार्तिक, तू ठरवलं आहेस का की फक्त टॉप सेलिब्रिटींनाच फॉलो करणार आहेस?", असा मजेशीर सवाल कपिलने कार्तिकला विचारला. विशेष म्हणजे कपिलच्या या प्रश्नावर काय उत्तर द्यावं हेच कार्तिकला समजलं नाही. मात्र, त्याच्या या मजेशीर प्रश्नामुळे उपस्थित सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू उमटलं.

दरम्यान, या शोमध्ये कार्तिकसोबत आलेल्या अभिनेत्री अमृता सुभाषने रेशमाच्या रेघांनी हे गाणं सादर केलं. तर, या गाण्यावर मृणाल ठाकूरने ताल धरल्याचं पाहायला मिळालं.

टॅग्स :कार्तिक आर्यनकपिल शर्मा सेलिब्रिटीमृणाल ठाकूर