मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेता श्रेयस राजे (Shreyas Raje) सातत्याने चर्चेत येत असतो. तो आजूबाजूला घडणाऱ्या घटनेवर आपले मत व्यक्त करत असतो. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, त्यावर कवितेच्या माध्यमातून श्रेयस व्यक्त झाला आहे. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर ही कविता शेअर केली आहे.
श्रेयस राजेने इंस्टाग्राम स्टोरीवर पहलगाम हल्ल्यावर कवितेरुपी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले की, अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड... ज्यात माझीही चाळण किंवा चिंधड्या होतील सवयीप्रमाणे... उरणार नाही माझं अस्तित्व म्हणून काहीच... उरेल ते फक्त निर्जीव हाड, मांस, रक्त आणि आतडी... उघडं पडलेलं तोंड, वाकडे झालेले हात पाय, आजूबाजूला असतील घोंगावणाऱ्या माश्या... आणि हो. कैक हजार वर्षांचे संदर्भ असतील माझ्या कुठेतरी जन्म घेतलेल्या देहाला.. ज्याला नाव दिलं जाईल मग हिंदू, मुस्लिम इत्यादी इत्यादी. काही दिवस चालेल हा सगळा अंत्यसंस्कार... युद्धाची गिधाडे घिरट्या घालतील मग आकाशाला... नेस्तनाभूत केले जातील आणखी काही कोवळे श्वास... हवेत पसरेल ह्या साऱ्याचा करपट वास...नंतर सगळं विरुन जाईल माझ्या चितेच्या धुरासारखं...शांततेची कबुतरं मग काही दिवस उडवली जातील कुंपण घातलेल्या आभाळात... सगळं काही सामान्य भासेल तोवर... पुढच्या सामान्यांचा बळी जात नाही जोवर...
दरम्यान, श्रेयस मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने 'लग्नाची बेडी', 'ती परत आलीये', 'फुलाला सुगंध मातीचा', 'जिगरबाज', 'भेटी लागी जीवा' या मालिकांमध्ये काम केले आहे. मराठी मालिकांसोबत वेब सीरिजमध्येही तो झळकला आहे. त्याने 'चारचौघी' या नाटकातही काम केले आहे.