भाऊसाहेब कऱ्हाडे दिग्दर्शित ‘ख्वाडा’ या चित्रपटाने दोन राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली, पण व्यवसायाने शेतकरी असलेल्या लेखक-दिग्दर्शक कऱ्हाडे यांनी हा चित्रपट कसा बनवला असेल याची सर्वांना उत्सुकता असेल. हा चित्रपट दुर्लक्षित राहिलेल्या मेंढपाळ या समाजावर भाष्य करतो. या चित्रपटाचे शूटिंग वास्तव ठिकाणी झाल्यामुळे कथानक जास्त प्रभावी ठरले आहे. शूटिंगसाठी स्थळ निवड हाच एक नैसर्गिक कलादिग्दर्शनाचा भाग होता. सिनेमॅटोग्राफर वीरधवल पाटील यांनी सगळी आऊटडोअर लोकेशन्स आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केली आहेत. जेजुरी, शिरूर, निमगाव म्हाळुंगी, इंगळेनगर, रांजणगाव आणि सिंहगडदेवी आदी भागांत चित्रपट घडला आहे. ज्यांना ग्लॅमर आणि गॉसिपची सवय आहे, अशांना ही ठिकाणे शोधूनही सापडायची नाहीत. हा चित्रपट पाहिल्यानंतर निर्माता आणि दिग्दर्शकांनी काय मेहनत घेतली आहे ते कळेल! या लोकेशन्समुळेच चित्रपटाला वास्तवतेचा परिसस्पर्श लाभला आहे.
लोकेशन्समुळे ‘ख्वाडा’ बनला वास्तववादी
By admin | Updated: October 9, 2015 02:45 IST