के. बालचंद्र: तामिळ चित्रपटसृष्टीचे ‘भीष्माचार्य’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 19:02 IST
चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन आणि पटकथा लेखन या तीनही क्षेत्रात लिलया वावरणारे एक नाव म्हणजे, कैलाशम बालचंद्र अर्थात के. बालचंद्र. ...
के. बालचंद्र: तामिळ चित्रपटसृष्टीचे ‘भीष्माचार्य’
चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन आणि पटकथा लेखन या तीनही क्षेत्रात लिलया वावरणारे एक नाव म्हणजे, कैलाशम बालचंद्र अर्थात के. बालचंद्र. कन्नड, तेलगू, मल्याळम आणि हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक म्हणून कार्य केले.‘एक दुजे के लिये’ यासारख्या त्यांच्या चित्रपटांनी तर इतिहास घडवला. ९ जुलै हा त्यांचा जन्मदिवस. ९ जुलै १९३० साली तामिळनाडूच्या तंजावूर जिल्ह्यातील नन्निलम येथे त्यांचा जन्म झाला. सन २०१४ मध्ये वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ‘के. बी.’या टोपण नावाने ओळखले जाणारे के. बालचंद्र इयाकुनार सिगाराम या नावानेही सर्वपरिचित होते. पटकथा लेखक म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला असला तरी त्यांना अभिनयाची आणि दिग्दर्शनाचीही आवड होती. चित्रपटापेक्षाही नाटकांवर त्यांचे खरे प्रेम होते. प्रारंभी नाटसृष्टीत काही काळ काम केल्यानंतरच ते चित्रपटसृष्टीत आले. १९६३ साली त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘मेजर चंद्रकांत’ हे नाटक अतिशय गाजले. याच नाटकावर त्यांनी पुढे त्याच नावाने चित्रपटही काढला. जो नाटकाइतकाच तुफान लोकप्रिय झाला होता. त्याच्याही आधी ‘सर्वर सुंदरम’ या चित्रपटाद्वारे त्यांनी पटकथालेखक म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले.‘निरकुमिझी’ या मूळ नाटकावर आधारित त्याच नावाने काढण्यात आलेल्या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. आणि दिग्दर्शक म्हणून त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. ‘एक दुजे के लिए’ या सुपरडूपर हिट चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून के. बालचंद्र आपल्याला परिचित आहेत. धर्म आणि भाषा यांचे असलेले वर्चस्व झुगारून सामाजिक एकात्मतेच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेला हा चित्रपट एक आदर्श प्रेमपट होता. म्हणूनच एकेकाळी केवळ तरुणाई नव्हे तर देशातील तमाम 'पब्लिक' या चित्रपटावर फिदा झाली होती. आपल्या ४५ वर्षांच्या कारकिर्दीत के. बालचंद्र यांनी विविध भाषांमधील शंभरहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. विशेष म्हणजे नवीन कलाकारांना काम करण्याची संधी देणे ही त्यांची खासियत होती.तामिळ सिनेसृष्टीतील महानायक, सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन यांना चित्रपटसृष्टीत आणण्याचे श्रेय के. बालचंद्र यांचेच. केवळ रजनीकांत व कमल हसन हेच नाहीत तर त्यांनी अनेक स्टार्सला संधी दिली. बस कंडक्टर, कारपेंटरचे काम करणारे रजनीकांत आधी कन्नड नाटकांमध्ये लहानमोठ्या भूमिका करायचे. पण १९७५ मध्ये के. बालचंद्र यांनी रजनीकांतमधला स्टार हेरला आणि त्यांनी त्यांना ‘अपूर्वा रगनगल’मध्ये ब्रेक दिला. हाच रजनीकांत नावाचा सुपरस्टार आज कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे. १९८३ मध्ये ‘जरा शी जिंदगी’ आणि १९८४ मध्ये कमल हसन सोबतचा ‘एक नई पहेली’ हे दोन चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केले.कमल हासन याला ‘अरंगेत्रम’ या चित्रपटाद्वारे के. बालचंद्र यांनी चित्रपटसृष्टीत ब्रेक दिला. तसेच या दोघांनाही त्यांनी ‘मुन्द्रू मुडिचू’, ‘आवरगल’आणि ‘निनायथले इनिक्कुम’ या चित्रपटामधून एकत्र आणले. के. बालचंद्र प्रारंभी रंगमंच कलाकार व लेखक होते. नाटककार ही त्यांची आधीची ओळख. ‘रागिनी रिक्रिएशन’ ही त्यांची नाट्य संस्था होती. ‘आईना’ या हिंदी चित्रपटानंतर त्यांनी ‘एक दुजे के लिए’ या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. शिवाय अनेक चित्रपटांच्या पटकथा लेखनाशी जुळले. सर्वप्रथम फणि मजुमदार यांनी के. बालचंद्र यांच्या ‘मेजर चंद्रकांत’ या नाटकावर आधारित ‘उँचे लोग’चे दिग्दर्शन केले. ‘उँचे लोग’ लष्कारचा रिटार मेजर चंद्रकांत यांची कथा होती. यानंतर १९६८ मध्ये एसएस वासन यांनी के. बालचंद्र यांचा तामिळ चित्रपट ‘भामा विजयम’चा हिंदी रिमेक आणला. ‘तीन बहुरानियां’नामक हा चित्रपट चांगलाच गाजला होता. १९७० मध्ये आलेल्या ए सुब्बाराव यांच्या ‘मस्ताना’, १९७१ मधील ‘लाखों मे एक’ आणि १९७२ मध्ये सी.पी. दीक्षित यांच्या ‘हार जीत‘ या चित्रपटांचे पटकथा लेखक के. बालचंद्र हेच होते. १९७७ मध्ये के. बालचंद्र यांनी राजेश खन्ना व मुमताज यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘आईना’ या हिंदी सिनेमाचे दिग्दर्शन केले. यानंतर १९८१ मध्ये त्यांनी ‘एक दुजे के लिए’चे दिग्दर्शन केले. कमल हसन व रती अग्निहोत्री यांचा हा चित्रपट तुफान गाजला होता. हिंदी भाषिक सपना आणि तामिळ भाषिक वासुदेवन यांची प्रेमकथा लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. के. बालचंद्र यांचे बहुतांश चित्रपट मध्यवर्गीय लोकांची सुख-दु:ख यांवर आधारित होते. तामिळ सिनेमाचा विकास आणि प्रसार यात त्यांचे मोठे योगदान राहिले . दूरदृष्टी असलेला आणि प्रवाहाच्या विरोधात लढणारा लेखक-दिग्दर्शक अशी त्यांची ओळख. भारतीय सिनेमात त्यांचे अपूर्व योगदान बघता त्यांनी पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. चित्रपटापेक्षा नाटकांवर अतिशय मनापासून प्रेम करणारे के. के. बालचंद्र तमिळ चित्रपटसृष्टीत आले त्यावेळी नायक-केंद्रित चित्रपटांची तमिळ चित्रपटसृष्टीत चलती होती. मात्र के. बालचंद्र यांनी अशा नायकप्रधान चित्रपटांचा पायंडा मोडीत काढण्यासाठी वास्तवतेला प्राधान्य देऊन चित्रपटाची कथा हीच सर्वोच्च नायक असते हे सिद्ध केले आणि तमिळ चित्रपटसृष्टीला पूर्णपणे वेगळे वळण दिले. ज्याचे रसिक प्रेक्षकांनी भरभरून स्वागत तर केलेच.