छोट्या पडद्यावरील तुफान लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. सध्या या मालिकेत नेहा आणि यश यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आल्याचं पाहायला मिळत आहे. लग्नापूर्वीच नेहा आणि यश पॅलेसमध्ये नवरा-बायको म्हणून राहात आहेत. इतकंच नाही तर परीदेखील आता त्यांच्यासोबत पॅलेसवर राहायला गेली आहे. विशेष म्हणजे परी या घरात आल्यापासून पॅलेसमधील वातावरण हळूहळू बदलतांना दिसत आहे. यात अलिकडेच तिने सिम्मीची बोलती बंद केली आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये काका आणि काकूदेखील पॅलेसवर राहायला आले आहेत. त्यामुळे दररोज प्रमाणे काकू देवपूजा करतात ज्यामुळे सिम्मी त्यांना चार शब्द सुनावते. परिणामी, सिम्मी काकूंना ओरडत असल्याचं पाहून परी त्यांची बाजू घेते आणि सिम्मीची बोलती बंद करते.
काकू देवपूजा करत असताना येत असलेल्या घंटेच्या आवाजाने त्रस्त झालेली सिम्मी रोज देवपूजा केली नाही तरी चालते असं काकूंना सांगते. त्यावर सिम्मी आजी तुम्ही रोज अंघोळ करता ना? मग देवालादेखील रोज अंघोळ करावी लागते. त्याला पण भूक लागते, असं परी सिम्मीला समजावते. थोडक्यात, चिमुकली परी सिम्मीला देवपूजेचं महत्त्व सांगते.
दरम्यान, परीचे हे बोल ऐकल्यानंतर मिथिला आणि काका यांना हसू अनावर होतं आणि ते हसू लागतात. पण, यापूर्वीही परीने सिम्मीची अशाच प्रकारे बोलती बंद केल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर या घरात परी आल्यानंतर अनेक सकारात्मक बदल होऊ लागले आहेत. विश्वजीत काकानेही दारू सोडण्याचा निर्णय घेतला आहे.