Join us  

लेखिका शिल्पा नवलकर यांचे पठडीबाहेरचे लेखन 'गुमनाम है कोई!'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 6:30 AM

प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका शिल्पा नवलकर यांच्या लेखणीतून 'गुमनाम है कोई!' या नाटकाची संहिता आकारास आली आहे.

 माणसाचे मन कधी कुणाला कळत नाही. कधी कोणाचे मन बदलेल आणि माणूस कसा वागेल हे सांगता येत नाही. हे सर्व मनाचे खेळ असतात. एखादी घटना, प्रसंगामुळे आघात झाला तर मन आणि माणसाची वागणूक बदलू देखील शकते. यावर आधारित पुढील जीवनप्रवास सुरू होतो. अशीच काहीशी गोष्ट साध्य झाली आहे 'गुमनाम है कोई!' या नाटकाच्या बाबतीत.

प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका शिल्पा नवलकर यांच्या लेखणीतून या नाटकाची संहिता आकारास आली आहे. भद्रकाली प्रोडक्शनची ही ५७ वी नाट्यकृती आहे. या नाटकाचे दिग्दर्शन मंगेश कदम यांनी केले असून अंगद म्हसकर,शैला काणेकर, प्राजक्ता दातार-गुणपुले, रोहित फाळके आणि मधुरा वेलणकर या नाटकात दिसतील. या नाटकाचा शुभारंभ २२ डिसेंबरला गडकरी रंगायतन येथे होणार आहे.याविषयी शिल्पा नवलकर सांगतात की, 'खरंतर भद्रकाली सारख्या संस्थेसोबत काम करताना वेगळी मजा आहे. सेल्फीनंतर देखील बरेच लिखाण केले. पण त्या दरम्यान नाटक देखील पुन्हा लिहावे हे डोक्यात होते. हा एक सायको ड्रामा आहे. त्यामुळे पहिला अंक लिहिल्यावर काही महिन्यानंतर मग दुसरा अंक लिहला. हे नाटक सेल्फी नाटकापेक्षा वेगळे असावे हे मनात पक्के होते. लेखकाच्या मनात आणि डोक्यात एखादा विषय पक्का असला की कोणतेही लेखन करायला वेळ लागत नाही. तरी साधारण एक वर्ष तरी हे नाटक लिहायला लागला असेल.

गुमनाम है कोई! या नाटकातील व्यक्तिरेखेविषयी त्या सांगतात की, " हे नाटक लेखिकेच्या मनावर अचानकपणे आघात झाल्यावर तिचे झालेले विचित्र वागणे यावर आधारित आहे. त्यात रेवती कारखानीस ही भूमिका मधुरा वेलणकर हीने साकारली आहे. खरेतर मी आणि मधुरा अगदी जुन्या मैत्रिणी असलो तरी मला मधुरा खरी अभिनेत्री आहे हे या नाटकातून जाणवते आहे. ही व्यक्तिरेखा तिला चांगलीच जमून आली आहे. त्यातील सूर तिने उत्तम पकडला आहे. 

टॅग्स :मधुरा वेलणकर