परश्या आर्ची आली आर्ची... हा डायलॉग कानावर जरी पडला तरी सैराट चित्रपटातील सीन डोळ्यासमोर उभा राहतो. सैराट चित्रपटाने व त्यातील परशा आणि आर्ची यांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. या चित्रपटातून रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. सैराट रिलीज होऊन ४ वर्षे झाले असतानाही आजही रिंकू व आकाश यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे.
रिंकू शाळेत असतानाच तिला सैराट हा चित्रपट मिळाला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. सैराट चित्रपटासाठी ऑडिशनची जाहिरात आली होती. नागराज मंजुळे रिंकूच्या कुटुंबीयांच्या परिचयाचे होते. त्यांनी नागराज यांच्याशी संपर्क साधला आणि अकलूजमध्ये १६ डिसेंबर २०१३ रोजी रिंकूचे ऑडिशन पार पडले. तब्बल एक वर्षांनी तिची निवड झाल्याचे कुटुंबीयांना सांगण्यात आले.
सैराट चित्रपटासाठी ऑडिशन घेत असताना रिंकू राजगुरूचे अभिनय कौशल्य आणि तिचा आवाज ऐकून नागराज मंजुळेंनी तिची निवड केली. त्यावेळी रिंकू अवघ्या १३ वर्षांची होती. त्यावेळी इयत्ता सातवीत शिकणाऱ्या रिंकूने आपल्या कौशल्याने सगळ्यांची मने जिंकली. पण या चित्रपटातील आर्चीने प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर केले. सैराटसाठी रिंकू राजगुरु बुलेट आणि ट्रॅक्टर चालवायला शिकली. रिंकूला बुलेट चालवताना पाहून असंख्य मुली बुलेट शिकल्या. सैराटनंतर रिंकूने हिंदी आणि कन्नड या दोन्ही भाषेत काम केले. ‘सैराट’ चित्रपटासाठी रिंकू राजगुरुला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.