Join us  

नागराज मंजुळेंनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केली पाच लाख रुपयांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 5:09 PM

आता दिग्दर्शक, निर्माते नागराज मंजुळें यांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

ठळक मुद्देनागराज मंजुळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रुपयांचे योगदान प्राप्त झाले, मी त्यांचा अतिशय आभारी आहे.

सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. स्थानिक सरपंचांपासून ते मंत्र्यांपर्यंत, शाळकरी मुलांपासून ते सरकारी नोकरदारांपर्यंत, व्यापाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत, पंढरपूरपासून ते शिर्डी देवस्थानपर्यंत सर्वांनीच मदतीचा हात पुढे केला आहे. सोशल मीडियावरही मित्रपरिवार एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन करत आहे. याकामी मराठी सिनेकलाकारही मागे नाहीत. अनेकांनी पुरग्रस्तांपर्यंत आपली मदत पोहोचवली आहे. आता दिग्दर्शक, निर्माते नागराज मंजुळें यांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

 

नागराज मंजुळेंनी आता पूरग्रस्तांना पाच लाख रुपयांची मदत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी पाच लाखांचा चेक सुपूर्द केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे त्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, नागराज मंजुळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रुपयांचे योगदान प्राप्त झाले, मी त्यांचा अतिशय आभारी आहे.

 

महाराष्ट्रावरील कोल्हा'पूरसंकट' देशाने पाहिलंय, देशभरातून त्यासाठी मदत येत आहे. मात्र, मुंबई आणि महाराष्ट्रातून जगभर पसरणारे बॉलिवूड कुठं गेलंय? बॉलिवूडकरांना हे संकट दिसत नाही का? असा प्रश्न या निमित्ताने अनेकांना पडला आहे. लानत है उनपर, जिनके पास दानत नही है.... असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील यावरून बॉलिवूडला चांगलेच फटकारले होते. पण त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बॉलिवूडमधून रितेश देशमुखने मदत केली. रितेश आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पूरग्रस्तांसाठी 25 लाखाचा चेक दिला होता. रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुरग्रस्तांसाठी 25 लाखाची मदत केली होती. त्यानंतर बॉलिवूडचे शहनशहा अमिताभ बच्चन यांनी 51 लाखांची मदत केली. अमिताभ बच्चन यांच्या मदतीनंतर लता मंगेशकर यांनी 11 लाखांची तर आमिरने 25 लाखांची मदत केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे त्या दोघांचे आभार मानले होते. 

 

टॅग्स :नागराज मंजुळेकोल्हापूर पूरसातारा पूरसांगली पूर