Join us  

'लेथ जोशी'सिनेमाची तैवान आणि रशिया महोत्सवात एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 11:00 AM

लेथ यंत्राशी भावनात्मकरित्या जोडलेल्या एका कामगाराची  भावस्पर्शी कथा "लेथ जोशी" या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर २० हून अधिक पुरस्कार पटकावलेला "लेथ जोशी" या चित्रपटानं आता रशिया आणि तैवानमध्ये धडक मारली आहे. या चित्रपटाची तैवानमधील ५८व्या आशिया पॅसिफिक चित्रपट महोत्सवासाठी आणि रशियातील साखलीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे.

अमोल कागणे स्टुडिओजच्या अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी प्रस्तुत केला आहे. प्रवाह निर्मिती, डॉन स्टुडिओज निर्मित हा चित्रपट मंगेश जोशी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, ओम भूतकर, सेवा चौहान, अजित अभ्यंकर आदींच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं समीक्षक आणि प्रेक्षकांची दाद मिळवली होती. 

लेथ यंत्राशी भावनात्मकरित्या जोडलेल्या एका कामगाराची  भावस्पर्शी कथा "लेथ जोशी" या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. काळाच्या ओघात कौशल्याची साधनं आणि त्याच्याशी जोडलेल्या भावनाही लोप पावतात. ही निरंतन प्रक्रिया आहे. "लेथ जोशी" या चित्रपटात लेथ या यंत्राशी जोडलेली कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. 

चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अमोल कागणे यांनी या महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवातील निवडीबाबत आनंद व्यक्त केला. 'हलाल या चित्रपटानंतर "लेथ जोशी" हा आशयसंपन्न चित्रपट आम्ही प्रस्तुत केला. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं भाष्य हा चित्रपट करतो. आतापर्यंत  २० हून अधिक महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला आहे. आता रशिया आणि तैवानमधील प्रतिष्ठेच्या महोत्सवांसाठी निवड होणं नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. या पुढील काळातही आम्ही असेच आशयसंपन्न चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत,' असं अमोल कागणे यांनी सांगितलं

अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी याआधी 'हलाल' या चित्रपटाची निर्मिती केली होती.हा चित्रपट लेखक राजन खान यांच्या कथेवर आधारित होता आणि याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी केले होते. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, प्रितम कागणे, प्रियदर्शन जाधव, छाया कदम, अमोल कागणे,विमल म्हात्रे, संजय सुगावकर आदी कलाकारांनी अभिनय केला होता. शिवाजी लोटण पाटील यांनी या चित्रपटात तिहेरी तलाकचा मुद्दा त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून मांडला होता.विवाह आणि तलाक या जीवनातील दोन महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मुस्लिम स्त्रियांच्या भावनांचा कितपत आदर केला जातो, या विषयावर आधारित हा चित्रपट होता. हा चित्रपट अनेक महोत्सवांमध्ये गौरवला गेला होता. तसेच या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले. या चित्रपटानंतर अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे याच जोडीने 'लेथ जोशी' हा चित्रपट रसिकांच्या भेटीस आणल्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबाबत चांगलीच उत्सुकता होती.