कॉलेज जीवनात एखादा क्रश असणं ही काही सध्याच्या काळात नवीन गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात क्रश असणं ही फार कॉमन गोष्ट झाली आहे. यात बऱ्याचदा कलाकार मंडळी त्यांच्या क्रशविषयी उघडपणे भाष्य करतात. यात एक लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री तिच्या क्रशविषयी व्यक्त झाली आहे. ही अभिनेत्री कोणत्या अभिनेत्याच्या किंवा क्रिकेटपटू वा राजकीय व्यक्तीच्या प्रेमात पडली नसून चक्क एका चहावाल्याच्या प्रेमात पडली होती. याविषयी तिने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
'कळत नकळत' या गाजलेल्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋजुता देशमुख (Rujuta Deshmukh). उत्तम अभिनयकौशल्य आणि निरागस चेहरा यांच्या जोरावर ऋजुताने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं. विशेष म्हणजे तिच्या सौंदर्याचे आजही अनेक चाहते आहेत. परंतु, अनेकांच्या मनावर राज्य करणारी ही अभिनेत्री चक्क एका चहावाला आवडल्याचं तिने सांगितलं.
'तुझा शाळेतला पहिला क्रश कोणता?' असा प्रश्न ऋजुताला विचारण्यात आला होता. त्यावर तिने चहावाल्याचं नाव पुढे घेतलं. "मला एक क्रश खूप जास्त आठवतोय. कारण, लहानपणी मी नाटकाच्या निमित्ताने खूप दौरे करायचे. त्यावेळी आम्ही बसनेच प्रवास करायचो. तर, एकदा एका दौऱ्यात आम्ही एका टपरीवर चहा प्यायला थांबलो होतो. त्या चहावाल्याचा एक मुलगा होता. तो इतका चिकना होता. त्यावेळी मी रायगडाला जेव्हा जाग येते नाटकात राजारामाचा रोल करत होते. तो मुलगा इतका भारी होता की हा जातांना मला परत भेटेल का? आपण पुन्हा इथेच चहा पिऊयात का? वगैरे असं त्यावेळी वाटलं होतं," असं ऋजुता म्हणाली.
दरम्यान, ऋजुता सध्या ३६ गुणी जोडी या मालिकेत अमुल्याच्या आईची भूमिका साकारत आहे. तसंच तिने रंग माझा वेगळा, 'जाऊ नको दूर बाबा', राजा शिवछत्रपती', 'आभाळमाया', 'तू माझा सांगाती' , 'स्वप्नांच्या पालिकडले' ,'आनंदी हे जग सारे' या मालिकांमध्ये काम केलं आहे. या व्यतिरिक्त ती 'रायगडाला जेव्हा जग येते' या नाटकामध्येही झळकली आहे.