Join us

चित्रपटांतून डान्स कधीच दूर होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2016 13:17 IST

सध्या नृत्यदिगदर्शकांना चांगलेच महत्व प्राप्त झाले आहे. अनेक शोज मध्ये देखील कोरिओग्राफर्स महत्वाची भूमिका बजावताता दिसतात. तर बºयाच कार्यक्रमांमध्ये ...

सध्या नृत्यदिगदर्शकांना चांगलेच महत्व प्राप्त झाले आहे. अनेक शोज मध्ये देखील कोरिओग्राफर्स महत्वाची भूमिका बजावताता दिसतात. तर बºयाच कार्यक्रमांमध्ये हे जज म्हणुन देखील काम करताना पाहायला मिळतात. पाहूयात मराठी चित्रपटसृष्टीतील दोन तगडे कोरिओग्राफर फुलवा खामकर आणि गणेश आचार्य याविषयी काय म्हणतात. एका संकेतस्थाळाला दिलेल्या मुलाखतीत या दोघांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. फुलवा सांगते, नृत्यविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांमध्ये तोच तोचपणा येणे साहजिक आहे. या सगळ्याच कार्यक्रमांचा साचा हा एकसारखा असतो. कित्येकदा असंही होतं की प्रेक्षकांना एखाद्याच परीक्षकाचं मत देणं आवडू लागतं आणि त्यामुळे तो प्रसिद्ध होतो, शोचा टीआरपी वाढतो. अशा परीक्षकाला निर्मात्यांकडून मागणी वाढली तर त्यात काही वावगे नाही. मात्र, आत्ताच्या नृत्यदिग्दर्शकांना चित्रपटांमधून काम नाही असे म्हणणे योग्य नाही. पूर्वी टीव्ही हे माध्यम प्रभावी नसल्याने चित्रपटातील डान्स मास्टर यांना महत्त्व होते, पण आता रिअ‍ॅलिटी शोमधून येणारी नवीन पिढीही तितक्याच चांगल्या पद्धतीने काम करते आहे. तुम्ही नृत्यकलेत निपुण आहात म्हणजेच तुम्ही चांगले नृत्यदिग्दर्शक आहात, असे नाही. नृत्यदिग्दर्शकाच्या मागे हरहुन्नरी अशा साहाय्यक नृत्यदिग्दर्शकांची फौज असते त्यामुळे प्रत्येक वेळी नृत्यदिग्दर्शक हा प्रत्येक शैलीत निपुण असणे गरजेचे नाही. असे फुलवा खामकरचे मत आहे. तर गणेश आचार्य सांगतात, जो वेगळे काही करून दाखवेल त्याला हिंदी चित्रपटच काय अनेक माध्यमांमध्ये स्वत:हून बोलवलं जातं. मी स्वत: या इंडस्ट्रीत किती वर्षे काम करतो आहे. आमच्याबरोबर साहाय्यक नृत्यदिग्दर्शकांची एक मोठी टीम असते. हळूहळू ते शिकून त्यांचं स्वतंत्रपणे काम सुरू करतात. या इंडस्ट्रीत तुम्ही तुमचं काम कसं पुढे नेता?, याची प्रत्येकाची पद्धत, शैली वेगळी असते. रेमो डिसूझासारखा नृत्यदिग्दर्शक तोही साहाय्यक म्हणूनच एके काळी काम करत होता. आज त्याने त्याच्या कामाच्या बळावर स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. नृत्यदिग्दर्शक म्हणून मर्यादित न राहता त्याने दिग्दर्शक बनण्याचंही स्वप्न पाहिलं. त्यामुळे नवीन नृत्यदिग्दर्शकांना हिंदी चित्रपटांत कामच नाही, तेच तेच नृत्यदिग्दर्शक पुढे येतात, या दाव्यांमध्ये काहीही अर्थ नाही. हिंदी चित्रपटांमधून गाणं आणि नाचणं दूर होणारं नाही. पण बदलत्या काळाबरोबर त्याच्या स्वरूपात होणारे बदल समजून घेऊनच काम केलं पाहिजे  असे गणेश आचार्य यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.