सिनेमा आणि नाट्यगृहे बंद असल्यामुळे अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे, धड जगताही येईना आणि मरताही येत नाही, अशी खंत नुकतीच ज्येष्ठ मराठी अभिनेत्री जयमाला इनामदार यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी व्यक्त केली.कलारंग परिवार सांस्कृतिक कला अकादमीच्या वतीने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात त्यांनी हजेरी लावली होती.यामध्ये श्री स्वामी समर्थ आदर्श समाज सेवा पुरस्कार रूग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. शाल, गौरवचिन्ह, पिंपलवृक्षाचे रोप देऊन त्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन कलारंग परिवाराचे अध्यक्ष संतोष उभे यांनी केले होते. गायक चित्रसेन भवार, रविंद्र खराडे यांच्यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.
अभिनेत्री जयमाला या अभिनेते प्रकाश इनामदार यांच्या पत्नी आहेत. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्या पाहायला मिळतात. त्यांच्या गाढवाचं लग्न या प्रसिद्ध नाटकाचे तब्बल २५०० हुन अधिक प्रयोग झाले होते. या नाटकाला राष्ट्रपती पदक विजेता नाटक म्हणून ओळख मिळाली होती.
जयमाला इनामदार यांचे सासरे डॉक्टर अप्पासाहेब इनामदार यांच्यानंतर पती प्रकाश इनामदार यांनी कलासंगम सांभाळले आता कलासंगमची धुरा जेष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार सांभाळताना पाहायला मिळतात. गेली ५५ वर्ष त्यांनी रंगभूमीची सेवा केली आहे.