Join us  

Happy Birthday: रुपेरी पडद्यावरील नटरंग ‘गुणा’ची रिअल प्रेमाची गोष्ट, ज्यामुळे कुटुंबीयांनाही बसलेला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 1:37 PM

मराठीसह हिंदी सिनेमात आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या अतुल कुलकर्णी यांनी अभिनेत्री गीतांजलीसह लग्न केलं.

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, या कवितेच्या ओळींप्रमाणे प्रत्येकाचं कुणावर तरी प्रेम असतं किंवा प्रत्येकाची काही ना काही प्रेमाची गोष्ट असते. अशीच काही तरी हटके प्रेमाची गोष्ट अभिनेता अतुल कुलकर्णी यांचीही आहे.

मराठीसह हिंदी सिनेमात आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकणाऱ्या अतुल कुलकर्णी यांनी अभिनेत्री गीतांजलीसह लग्न केलं. या दोघांच्या प्रेमाची गोष्टही तितकीच हटके आहे. १९९३ साली एनएसडीमध्ये अतुल आणि गीतांजली यांची भेट झाली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

२९ डिसेंबर १९९६ रोजी पुण्यात दोघं रेशीमगाठीत अडकले. मात्र गीतांजली यांच्यासह ओळख होणं, मग मैत्री आणि त्याचं रुपांतर प्रेमात होणं हे सुखद आश्चर्याचा धक्का होता असं अतुल कुलकर्णी यांनी टीव्हीवरील एका प्रसिद्ध चॅट शोमध्ये सांगितलं होतं. स्वतःसाठीच नाही तर हा कुटुंबीयांसाठीही मोठा धक्का होता अशी कबूली अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतलेल्या अतुल यांना ‘हे राम’ आणि ‘चांदनी बार’ सिनेमातील भूमिकांसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. विविध भाषांमधून ६० पेक्षा जास्त सिनेमात काम केलेल्या अतुल यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.  हे राम, चांदनी बार, खाकी, पेज ३, रंग दे बसंती, वळू, नटरंग, एका प्रेमाची गोष्ट अशा सिनेमांमधून त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.

अतुल कुलकर्णी रात्रीच्या जेवणाची ही वेळ कधीच चुकवत नाहीत, फोटो होतोय व्हायरल

 अतुल कुलकर्णीचं शुटिंगचं शेड्युअल टाइट असतं. मात्र कितीही बिझी असले तरी अतुल कुलकर्णी आपल्या जेवणाची वेळ चुकवत नाहीत. नुकतंच एका सिनेमाच्या शुटिंगसाठी ओडिशा इथे जात होते. प्रवासादरम्यान त्यांच्या रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती.

ही वेळ होती संध्याकाळी ६.३० वाजता. हो तुम्ही बरोबर वाचलं आहे. कारण अतुल कुलकर्णी कुठेही जात असले तरी रात्रीच्या जेवणाची ही आपली नेहमीची वेळ कधीच चुकवत नाही. मग काय ओडिशाच्या प्रवासात वाटेत संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. गाडीतच मागच्या बाजूला बसून त्यांनी जेवणावर ताव मारला. जेवण करतानाचा हाच फोटो खुद्द अतुल कुलकर्णीने ट्विटरवर शेअर केला आहे.

या फोटोवर त्यांच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. फॅन्सनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कुठेही असलो तरी संध्या. ६.३० वा. ही रात्रीच्या जेवणाची वेळ चुकवत नसल्याचं अतुल कुलकर्णीने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :अतुल कुलकर्णी