मनोरंजनासोबतच प्रबोधन करणारा ‘माझा एल्गार’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 10:17 IST
स्त्री केंद्रबिंदू असलेल्या चित्रपटांची मराठी चित्रपटसृष्टीत मोठी परंपरा आहे. आज प्रदर्शित होणाऱ्या ‘माझा एल्गार’ या चित्रपटातही एका तरुणीच्या संघर्षाची ...
मनोरंजनासोबतच प्रबोधन करणारा ‘माझा एल्गार’
स्त्री केंद्रबिंदू असलेल्या चित्रपटांची मराठी चित्रपटसृष्टीत मोठी परंपरा आहे. आज प्रदर्शित होणाऱ्या ‘माझा एल्गार’ या चित्रपटातही एका तरुणीच्या संघर्षाची कथा पहायला मिळणार आहे. श्री सद्गुरू फिल्म्स प्रोडक्शनच्या ‘माझा एल्गार’ चित्रपटाची निर्मिती सौरभ आपटे यांनी केली असून, प्रस्तुती श्रीकांत आपटे यांची आहे. दिग्दर्शक मिलिंद कांबळे यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली असून, चेतन किंजळकर यांनी पटकथा व संवादलेखन केले आहे.मिलिंद कांबळे यांनी या चित्रपटात अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या एका तरुणीची कथा दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे सादर केली आहे. ऐश्वर्या राजेश या नवोदित अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारत आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या बळावर ‘माझा एल्गार’मध्ये रंग भरले आहेत. या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत दाखल होणाऱ्या यश कदम या अभिनेत्यासोबत तिची जोडी जमली आहे. ऐश्वर्या-यश यांची ‘ऑनस्क्रीन केमिस्ट्री’ प्रेक्षकांना नक्कीच भावेल अशी आशा आहे.स्वप्निल राजशेखर यांनी महंताच्या भूमिकेद्वारे या चित्रपटात खलनायकी रंग भरले आहेत.समाजात आजही श्रद्धेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल केली जात असून, त्याचेच प्रतिबिंब ‘माझा एल्गार’ या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार असल्याचे दिग्दर्शक मिलिंद कांबळे सांगतात. तर हा चित्रपट मनोरंजनासोबतच प्रबोधन करणारा असल्याचे निर्माते सौरभ आपटे यांचे म्हणणे आहे. आजच्या काळातील तरुणी आणि देवभोळ्या जनतेला आपल्या जाळ्यात ओढणारा लबाड महंत यांच्यातील चित्तथरारक संघर्ष या चित्रपटात पहायला मिळेल. छायांकन उमेश पोफळे यांनी केले आहे,तर नकुल प्रसाद- प्रज्योत पावसकर यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. जितेंद्र जैस्वार या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.शीर्षकावरून या चित्रपटात एक संघर्ष कथा पहायला मिळणार असल्याचं सहज लक्षात येतं. या सोबतच ‘माझा एल्गार’मध्ये एक प्रेमकथाही आहे. या प्रेमकथेचा नायक यश कदम असून, ऐश्वर्या राजेश ही नायिका आहे. ऐश्वर्या आणि यश या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले आहेत. दोघांचाही मुख्य भूमिकेतील हा पहिलाच चित्रपट आहे. ऑडीशनच्या माध्यमातून दोघांचीही या चित्रपटात एंट्री झाली आहे.ऐश्वर्या ही एक उत्तम अभिनेत्री असून, अभिनयाचे गुण तिच्या अंगी उपजत आहेत. तिच्यासोबत काम करताना कधीही नवखेपणाची जाणीव झाली नसल्याचं यश मानतो. यशसोबत काम करताना सुरुवातीला थोडं अवघडल्यासारखं वाटलं होतं, पण त्याच्या दिलखुलास स्वभावामुळे काम करणं सोपं झाल्याचं ऐश्वर्या म्हणते.यामुळे ऐश्वर्या आणि यशची ‘ऑनस्क्रीन केमिस्ट्री’ धमाल उडवून देईल अशी आशा आहे. ऐश्वर्या आणि यश या जोडीसोबत स्वप्निल राजशेखर, अमोल रेडीज, अर्चना जोशी, ऋचा आपटे, गंधार जोशी, प्रफुल्ल घाग, राजकिरण दळी, गोपाळ जोशी, सचिन सुर्वे, नितीन जाधव, पूजा जोशी, वैदेही पटवर्धन, डॉ भगवान नारकर आदि कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.या चित्रपटाची कथा, दिग्दर्शक मिलिंद कांबळे यांनीच लिहिली आहे.