Join us  

कंगना जे बोलली ते खरंय, मी समर्थन करतो...! ‘पंगा गर्ल’ला विक्रम गोखलेंचा पाठींबा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 2:45 PM

1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती, या अभिनेत्री Kangana Ranautच्या वक्तव्यावरून वाद पेटला असताना आता मराठीतील ज्येष्ठ अभिनेते Vikram Gokhale यांनी या वादात उडी घेतली आहे.

1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती, या अभिनेत्री कंगना राणौतच्या  (Kangana Ranaut) वक्तव्यावरून वाद पेटला असताना आता मराठीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी या वादात उडी घेतली आहे. कंगना जे बोलली ते खरं आहे, ती जे बोलली मी त्याचं समर्थन करतो, असे विक्रम गोखले म्हणाले. 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने विक्रम गोखले यांचा सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांशी बोलताना गोखलेंनी ही भूमिका मांडली.  कंगनाच्या वक्तव्यावर म्हणाले...

कंगना बोलती ते अगदी खरंय. मी तिच्या वक्तव्याचं समर्थन करतो. कोणाच्या मदतीने स्वातंत्र्य मिळालेलं नाही. ते भिकेतच मिळालंय.  आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना वाचवलं नाही, हे चुकीचे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

भारतीय स्वातंत्र्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे कंगनावर जोरदार टीका होत आहे. तिचा पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याची मागणी होतेय.आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असं कंगना एका मुलाखतीदरम्यान म्हणाली अणि तिच्यावर टीकेची झोड उठली. 

हा देश कधीही हिरवा होणार नाही...हा देश कधीही हिरवा होणार नाही... हा देश भगवा राहिला पाहिजे. जे 70 वर्षात झालं नाही ते मोदींनी केलं, पक्षाचे काम सर्व करतात, पण ते देशासाठी  चांगलं काम करतात, अशा शब्दांत विक्रम गोखले यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं.

तर बरं होईल...भाजप आणि शिवसेना यांच्यातील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर फार बरं होईल, असं ते म्हणाले.  बाळासाहेब यांनी ज्या कारणाने शिवसेना स्थापन केली त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील हे मी समजू शकतो. गणित चुकलेलं आहे आणि ते सुधारायचा असेल तर भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही.   शिवसेना भाजप पुन्हा एकत्र यावेत, अशी माझी इच्छा आहे. याबाबत मी पुढाकार घेतलाय आणि घेईन, असंही विक्रम गोखले म्हणाले. 

टॅग्स :विक्रम गोखलेकंगना राणौत