Join us  

गौरी नलावडे सांगतेय या कारणामुळे स्वीकारली 'सूर राहू दे' ही मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 5:21 PM

'सूर राहू दे' या मालिकेत गौरी एक साध्या-सरळ भावनिक असलेल्या आरोहीच्या भूमिकेत दिसतेय तर संग्राम एक करियर ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल असलेल्या तन्मय नावाच्या मुलाची भूमिका साकारत आहे. 

झी युवा या वाहिनीवर 'सूर राहू दे' ही मालिका नुकतीच सुरू झाली आहे. दोन अगदी भिन्न स्वभावाच्या व्यक्तींची ही प्रेमकथा असून या मालिकेतून गौरी नलावडे आणि संग्राम साळवी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या मालिकेत गौरी एक साध्या-सरळ भावनिक असलेल्या आरोहीच्या भूमिकेत दिसतेय तर संग्राम एक करियर ओरिएंटेड आणि प्रॅक्टिकल असलेल्या तन्मय नावाच्या मुलाची भूमिका साकारत आहे. 

गौरी नलावडे या मालिकेद्वारे तीन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतत आहे. तिच्या या भूमिकेविषयी ती सांगते, मी बऱ्याच वेळापासून एका चांगल्या भूमिकेची वाट पाहत होती. मला मालिका करायचीच होती. झी युवा सारखी वाहिनी आणि मंदार देवस्थळी यांची कथा त्यामुळे मी या मालिकेसाठी लगेचच होकार दिला. 'सूर राहू दे'ची कथा एक टिपिकल प्रेमकथा नसून एक सशक्त कथा आहे. मी माझ्या पहिल्या मालिकेत देखील मंदार सरांसोबत काम केलं आहे आणि झी युवा वरील मंदार देवस्थळी दिग्दर्शित गुलमोहर या मालिकेत मी एका भागात त्यांच्यासोबत काम केलंय, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यात एक कम्फर्टझोन निर्माण झाला आहे. मी एका वेगळ्या साच्यातील या मालिकेत प्रमुख भूमिका निभावतेय याचा मला आनंद होत आहे. आरोही ही स्वावलंबी आहे आणि ती तितकीच भावनिक आणि संवेदनशील आहे. मी खऱ्या आयुष्यातील बहुतांशी तशीच आहे. मी स्वतः देखील गेली ६-७ वर्षं माझ्या कामामुळे माझ्या कुटुंबापासून दूर एकटी राहत आहे, त्यामुळे मी देखील आरोहीसारखीच स्वावलंबी बनली आहे. ही एक गोष्ट आमच्या दोघींमध्ये नक्कीच सारखी आहे. त्यामुळे हे पात्र मला माझ्या खूप जवळचे वाटते. तसेच आरोहीची खानावळ असल्याचे या मालिकेत दाखवण्यात आलेले आहे. मला देखील खऱ्या आयुष्यात चांगले जेवण बनवता येते. या मालिकेत संग्राम माझ्यासोबत काम करत आहे. आम्ही दोघे आधीपासून एकमेकांना ओळखतो आणि विशेष म्हणजे तो माझी सर्वात जवळची मैत्रीण खुशबू तावडेचा नवरा आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करायला खूप मजा येत आहे. 

 

टॅग्स :गौरी नलावडेसूर राहू दे