Join us

लग्नानंतर करिअर कधीच संपत नसते

By admin | Updated: October 14, 2016 05:53 IST

काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे ‘मिसेस इंडिया अर्थ’ ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये देशभरातून ५ हजार महिलांनी अर्ज केला होता. यांपैकी ४१ महिलांनी

काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे ‘मिसेस इंडिया अर्थ’ ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये देशभरातून ५ हजार महिलांनी अर्ज केला होता. यांपैकी ४१ महिलांनी अंतिम फेरी गाठली होती.या अंतिम फेरीमध्ये पुण्यामध्ये राहणारी प्रीनित ग्रेवाल हिने ‘मिसेस इंडिया अर्थ’चा क्राऊन जिंकला. तिच्या या प्रवासाबद्दल प्रीनितने लोकमत सीएनएक्सशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा.१. देशभरातून ५ हजार महिलांमधून तू हा मिसेस इंडिया अर्थचा यशस्वी क्राऊन जिंकलास, त्या वेळी तुझ्या भावना काय होत्या?- ज्या वेळी मिसेस इंडिया अर्थ म्हणून माझे नाव घेण्यात आले, त्या वेळी काही काळ माझा विश्वास बसला नव्हता, पण खरंच तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता. मी कधी विचारही केला नव्हता, हा क्राऊन मला मिळेल. मी फक्त एक अनुभव घेण्यासाठी या स्पर्धेत सहभागी झाले होते. हा क्राऊन जिंकल्यानंतर आज माझ्या कुटुंबालाही माझा अभिमान वाटतो आहे. २. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुझ्या कुटुंबाचा सपोर्ट कसा होता?- मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते. कारण माझ्या माहेरच्या आणि सासरच्या दोन्ही कुटुंबांचा मला पाठिंबा होता. माहेरी मला मुलगी म्हणून कधीच दुय्यम वागणूक दिली गेली नाही, तर सासरी आल्यानंतरही माझ्यावर कोणतीच बंधने लादण्यात आलेली नाहीत. सासरच्यांनी मला माझ्या करिअरसाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. आज जे काही यश मला मिळाले आहे, त्यात दोन्ही कुटुंबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या सपोर्टमुळेच हे शक्य झाले.३. लग्न झाले म्हणजे करिअर संपले, असा काहीसा समज मुलींमध्ये निर्माण झाला आहे. अशा मुलींना तू काय सांगू इच्छितेस?- करिअरमध्ये लग्न ही कधीच बाधा ठरत नाही. कारण शादी ये चाहो तो दिवार बन सकती, चाहो तो दरवाजा भी बन सकता है। लग्नानंतर करिअर संपते हे म्हणणे चुकीचे आहे. तुम्ही घर आणि करिअर कसे सांभाळता, हे तुमच्यावर आहे. या दोन्ही गोष्टी जर तुम्ही योग्य पद्धतीने संभाळू शकलात तर लग्नानंतर करिअर कधीच संपत नसते. ४. मिसेस इंडिया अर्थच्या प्रवासाबद्दल काय सांगशील?- खरे सांगू का? मी फुलटाइम जॉब करते. त्यामुळे मिसेस इंडिया अर्थच्या तयारीसाठी मला खूप वेळ मिळाला नाही. मी जास्त काही अभ्यास करू शकले नाही; पण माझ्याबरोबर स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर स्पर्धकांनी बरीच तयारी केली होती. त्यांनी मिसेस इंडिया अर्थमध्ये सहभागी होण्याआधी ट्रेनिंग वगैरे घेतले होते. मी फक्त यू टयूब आणि गुगलवर बघून सर्व शिकले होते. ५. पुढच्या स्पर्धेसाठी काय तयारी केली आहे का?- पुढची स्पर्धा ही अमेरिकेत होणार आहे. या स्पर्धेत मी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. मी पूर्ण अभ्यास करूनच या स्पर्धेत सहभागी होणार आहे, तसेच देशासाठी काहीतरी करण्याची संधी मला या निमित्ताने मिळाल्याने मी खूप आनंदी आहे.