Join us  

"माझ्या भावासोबत लग्न करशील का "? प्रसिद्ध निर्मातीने विद्या बालनसमोर ठेवला होता लग्नाचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 5:29 PM

बालाजी टेलिफिल्म्सच्या 'हम पाँच' या मालिकेतून विद्याने अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती.

आजवर विद्याने आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. सिनेमातील विद्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या मनात घर करुन आहेत. रसिकांची लाडकी विद्या सिद्धार्थ रॉय-कपूरसह रेशीमगाठीत अडकली. मात्र लग्नानंतरही विद्याची जादू कमी झालेली नाही. रुपेरी पडदा गाजवणा-या या अभिनेत्रीला सिद्धार्थसह लग्नबंधनात अडकण्यापूर्वी एका अभिनेत्यासह लग्न करण्याची मागणी घालण्यात आली होती. त्या अभिनेत्यासाठी विद्याला लग्नाची ही मागणी डेली सोप क्वीन एकता कपूर हिने घातली होती. तो अभिनेता कोण हे जाणून घेण्यासाठी काही वर्षे मागे जावं लागेल. 

रुपेरी पडद्यासह विद्याने करिअरच्या सुरुवातीला छोटा पडदाही गाजवला होता. बालाजी टेलिफिल्म्सच्या 'हम पाँच' या मालिकेतून विद्याने अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. त्या मालिकेदरम्यान विद्या आणि एकता कपूरची मैत्री झाली होती. एकदा विद्या आपला मानधनाचा चेक घेण्यासाठी बालाजी टेलिफिल्म्सच्या ऑफिसला गेली. त्यावेळी विद्याला चेक दिल्यानंतर एकताने तिला काहीतरी सांगायचं आहे, घरी चल अशी गळ घातली. मैत्रीणीसाठी विद्या तिच्या म्हणजेच अभिनेता जितेंद्र यांच्या घरी गेली.

त्यावेळी तिथे एकताचा भाऊ आणि सध्याचा अभिनेता तुषार कपूरही होता. तेव्हा कसलाही विचार न करता एकताने विद्याला एक प्रश्न विचारला. ती म्हणाली, विद्या तू माझ्या भावाशी म्हणजेच तुषारशी लग्न करशील का? हे ऐकून काय बोलावे हेच विद्याला सुचले नाही आणि स्वभावानुसार ती जोरजोरात हसू लागली. त्यावेळी लाजराबुजरा तुषारसुद्धा मान खाली घालूनच उभा होता. 

यानंतर 'डर्टी पिक्चर' सिनेमात काम करेपर्यंत तुषार आणि विद्याचे बोलणं झालं नव्हतं. या सगळ्याचा खुलासा विद्याने स्वतः केला आहे. मात्र एकताने भावासाठी विद्याला घातलेली लग्नाची मागणी म्हणजे 'वेड्या बहिणीची वेडी ही माया' असं म्हटल्यास वावगं ठरु नये.

 

टॅग्स :विद्या बालनएकता कपूर