Join us

‘टायगर जिंदा हैं’ रिलीज होताच झाला कडाडून विरोध, जयपूरमध्ये जाळला सलमान खानचा पुतळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 20:06 IST

अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचा ‘टायगर जिंदा हैं’ हा चित्रपट आज (शुक्रवार) रिलीज झाला असून, पहिल्याच दिवशी ...

अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचा ‘टायगर जिंदा हैं’ हा चित्रपट आज (शुक्रवार) रिलीज झाला असून, पहिल्याच दिवशी वादाच्या भोवºयात सापडला आहे. जयपूरमध्ये चित्रपटाला कडाडून विरोध करण्यात आला असून, तीव्र स्वरूपाचे प्रदर्शन करत सलमानचा पुतळा जाळला आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या चित्रपटानंतर आता राजस्थानमध्ये ‘टायगर’चा विरोध केला जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, जयपूरच्या ऐतिहासिक चित्रपटगृहात ‘टायगर जिंदा हैं’ रिलीज करण्यात आला. परंतु त्याठिकाणी प्रचंड तोडफोड करण्यात आली. चित्रपटाचे पोस्टर फाडण्यात आले, तसेच सलमानचा पुतळाही जाळण्यात आला. एवढेच नव्हे तर शहरात रॅलीही काढण्यात आली. वास्तविक हा विरोध वाल्मीकी समाजाकडून करण्यात आला. त्यांचा आरोप आहे की, सलमानने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वाल्मीकी समाजाबद्दल चुकीचे वक्तव्य केले. याच कारणामुळे सलमानच्या चित्रपटाचे सर्व शो थांबविण्याची मागणी समाजाकडून केली जात आहे. त्यासाठी वाल्मीकीसमाजाचे लोक जयपूर येथी राममंदिर चित्रपटगृहाबाहेर एकत्र येऊन विरोध करताना दिसत आहेत. याव्यतिरिक्त अंकूर आणि पारस थिएटरसमोरही जोरदार विरोध केला जात आहे. काही दिवसांपूर्वी सलमान आणि शिल्पा शेट्टीने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आपल्या डान्स स्टेपविषयी सांगताना ‘भंगी’ या शब्दाचा वापर केला होता. ज्यामुळे वाल्मीकी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यातच शिल्पा शेट्टीने याच शब्दाचा वापर करताना म्हटले की, मी घरी असताना अशीच दिसत असते. त्यावरून समाजात तिच्याविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे सलमान आणि शिल्पाच्या विरोधात याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर या दोघांवर लवकरात लवकर कारवाई केली जावी, अशी मागणीही आता केली जात आहे. दरम्यान, अली अब्बास जफर यांच्या दिग्दर्शनाअंतर्गत ‘टायगर जिंदा हैं’ची फर्स्ट डे फस्ट शोची ओपनिंग ८० टक्के झाली आहे.