Join us  

बहुप्रतिक्षित जयेशभाई जोरदारचा फर्स्ट लूक आला समोर, सिनेमासाठी रणवीर सिंगने अशी घेतली मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 9:00 AM

रणवीर हा एखाद्या नवोदितासोबत काम करण्याचे ठरवतो, तेव्हा दिव्यांगमध्ये काहीतरी खास बात असणार हे प्रेक्षकांना पक्के ठाऊक झाले आहे.

नवोदित लेखक-दिग्दर्शक दिव्यांग ठक्करच्या सिनेमाकरिता रणवीर सिंग आणि यश राज फिल्म्स एकत्र येत आहेत. रणवीर या सिनेमाच्या कथानकाला ‘जादुई स्क्रिप्ट’ संबोधतो. आपल्या पहिल्याच प्रयत्नात दिव्यांग हा रणवीरवर दिग्दर्शन कौशल्य आजमावतो आहे. गुजरात येथील सेटवर एका विनोदी मनोरंजनकर्त्याच्या रुपात आपला सुपरस्टार प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज होतो आहे. हा अभिनेता पहिल्यांदाच गुजराती माणसाच्या भूमिकेत झळकणार आहे. सिनेमातील रणवीरचा फर्स्ट लूक पाहण्यासाठी साहजिकच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. 

यावेळी करण्यात आलेल्या खास छायाचित्रणात रणवीरने स्वत:त केलेला बदल स्पष्टपणे दिसून येतो. त्याने अनेक किलो वजन कमी केले आहे. त्याला आपण ओळखू शकणार नाही इतका बदल दिसून येतो. त्याच्या मागे उभ्या असलेल्या महिलांचा बचाव करताना रणवीर पाहायला मिळणार आहे. रणवीर हा बॉलिवूडमध्ये स्त्रियांच्या बचावासाठी तत्पर असलेल्या अल्फा हिरोसारखा मुळीच नाही. हा सिनेमा महिला सबलीकरणासारख्या विषयावर भाष्य करणारा असल्याची खात्री सिनेमाचा पहिला लूक पाहताना पटते.  

“एकदा चार्ली चॅप्लिन म्हणाला होता, ‘मनमुराद हसायचे असेल तर आधी स्वत:च्या वेदना स्वीकारा आणि त्या वेदनांबरोबर खेळत रहा!’. जयेशभाई हा एक अविश्वसनीय हिरो आहे. वास्तविक तो एक सामान्य माणूस आहे जो एखाद्या असामान्य स्थितीत सापडल्यास काहीतरी असामान्य करतो. जयेशभाई संवेदनशील व मनात करुणा भाव असलेला इसम आहे. समाजात स्त्री-पुरुष समानता असावी या मताचा आहे. आपल्या समाजात पुरुषप्रधान मतप्रवाह, पद्धती आणि शिकवणीचा पगडा खोलवर रुजल्याचे तो मानतो,” रणवीर त्याची व्यक्तिरेखा उलगडतो. तो म्हणतो, “जयेशभाईमुळे मला उत्साहवर्धक आव्हान मिळाले – मला स्वत:चे शरीर रोडावून घ्यावे लागणार होते. यापूर्वी कधीही दिसलो नसेन असा लूक बदलायचा होता.”

रणवीरने कमावलेल्या शरीरामुळे त्याच्यावर सुपरस्टारडमवर हा शिक्का बसला आहे. त्याने सातत्याने देशातील सर्वोत्तम सिनेकर्त्यांसोबत काम केले आहे व प्रकल्पासाठी स्क्रिप्टची निवड अद्वितीय असते. त्याने पद्मावतसारखी कथा निवडली, त्याच्यावर जगभरातून प्रशंसेचा वर्षाव झाला. त्याने साकारलेला खलनायकी अलाउद्दीन खिलजी लक्षवेधक ठरला. त्यानंतर गली बॉय हा एक भक्कम कथाबीज असलेला सिनेमा ब्लॉकबस्टर झाला. आज त्याने देशाच्या कानाकोपऱ्यात आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. रणवीर हा एखाद्या नवोदितासोबत काम करण्याचे ठरवतो, तेव्हा दिव्यांगमध्ये काहीतरी खास बात असणार हे प्रेक्षकांना पक्के माहिती झाले आहे.  हा अष्टपैलू अभिनेता दिग्दर्शकाच्या कौशल्याची तारीफ करताना थकत नाही. “दिव्यांगने संहितेत जीव ओतून काम केले आहे. त्याचा सिनेमा पाहताना चेहऱ्यावर हसू उमटल्याशिवाय राहणार नाही. सिनेमा पाहणाऱ्याची सारखी करमणूक होणार आहे,” असे तो सांगतो. 

हा सिनेमा वायआरएफच्या परिवारातील निर्माता मनीष शर्मा याने निर्माण केला असून दिव्यांगसारखा हिरा मनीषनेच शोधला आहे.मनीष म्हणतो, “भूमिकेत शिरण्याची वेळ येते तेव्हा रणवीर बिनधास्त असतो. तो कायमच जोखीम उचलायला तयार असतो. जयेशभाई जोरदारकरिता अपेक्षित असलेला नायक दिव्यांगच्या डोक्यात पक्का साकारला होता. हा नायक अकल्पित असा सुपरहिरो आहे. त्याचा बांधा दणकट नाही किंवा शरीरयष्टी कमावलेली नाही. दिग्दर्शकाच्या द्रष्टेपणावर, आत्मविश्वासावर विश्वास न दाखवणे हे तुमच्या “इमेज”च्या विरुद्ध जाण्यासारखे आहे. त्यामुळेच रणवीर हा फिल्ममेकर्सना आवडतो. 

टॅग्स :रणवीर सिंग