Join us  

#Metoo : विकास बहलने अनुराग कश्यप व विक्रमादित्य मोटवानीला म्हटले संधीसाधू, पाठवले नोटीस!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 12:40 PM

होय, विकास बहलने अनुराग कश्यप व विक्रमादित्य मोटवानी या दोघांनाही कायदेशीर नोटीस बजावले आहे.

दिग्दर्शक विकास बहल सध्या गैरवर्तनाच्या आरोपांचा सामना करतोय. २०१५ मध्ये ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटाच्या प्रमोशन टूरदरम्यान विकास बहलने आपली छेडछाड केली होती, असा आरोप त्याच्याच एका महिला क्रू मेंबरने केली आहे. या महिलेच्या आरोपानंतर अभिनेत्री कंगना राणौत आणि नयनी दीक्षित यांनीही विकास बहलवर गंभीर आरोप केलेत. हे प्रकरण गाजत असताना ‘फँटम फिल्म्स’मध्ये विकासचे दोन भागीदार अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी हेही विकासच्या विरोधात बोलले. विकासने असे केले होते, असे अनुराग कश्यप आणि विक्रमादित्यने मान्य केले. संबंधित महिलेने केलेल्या आरोपांवर अनुरागने ट्विट करत विकास बहलने जे केले ते भीतीदायक आहे, असे म्हटले होते. मला त्या महिलेवर पूर्ण विश्वास आहे. तिला पाठींबा आहे, असेही अनुरागने म्हटले होते. विक्रमादित्यनेही अनुरागची री ओढत विकास बहलच्या कृत्याची निंदा केली होती.या संपूर्ण प्रकरणाला आता एक वेगळी कलाटणी मिळाली आहे. होय, विकास बहलने अनुराग कश्यप व विक्रमादित्य मोटवानी या दोघांनाही कायदेशीर नोटीस बजावले आहे. केवळ इतकेच नाही तर विकास बहलने अनुराग व विक्रमादित्य या दोघांनाही संधीसाधू संबोधले आहे.अनुराग व विक्रमादित्य यांनी आपल्याविरोधात सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट डिलीट कराव्यात आणि आपली प्रतीमा मलिन केल्याबद्दल माफी मागावी. असे न केल्यास आपण कायदेशीर कारवाई करू, असे विकास बहलने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. आता या नोटीसवर अनुराग आणि विक्रमादित्य काय पाऊल उचलतात, ते बघूच़

टॅग्स :विकास बहलअनुराग कश्यपमीटूकंगना राणौत