Manoj Bajpayee : अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) बॉलिवूडमधील अष्टपैलू कलाकारापैंकी एक आहेत. मनोज वाजपेयींनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत जवळपास १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शिवाय ओटीटीवरही त्यांचा बोलबाला आहे. पण, शाहरुख खान आणि इरफान खान यांच्या तुलनेत मनोज यांना त्याच्या हक्काचं यश आणि लोकप्रियता मिळायला थोडा उशीर झाला, असं अनेक चाहत्यांचं मत आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही दिग्गज अभिनेत्यांचा इंडस्ट्रीतील संघर्षाचा काळ एकच होता. एका मुलाखतीत मनोज वाजपेयी यांनी इरफान खान आणि शाहरुख खानबद्दल भाष्य केलं होतं. इरफान खानबद्दल कधी ईर्ष्या वाटली का? यावरही त्यांनी खुलासा केला होता.
मनोज वाजपेयी हे नेहमीच त्यांच्या मुलाखतींमधून काही खास किस्से सांगत असतात. अशीच त्याची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. ज्यामध्ये मनोज वाजपेयीनं दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्याबद्दलचे आपले विचार व्यक्त केले. तसेच, शाहरुख खानवरही भाष्य केलं होतं. अनफिल्टर्ड बाय समदीशला दिलेल्या मुलाखतीत 'मनोज वाजपेयींना कधी इरफान खानबद्दल कधी ईर्ष्या वाटली का, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अभिनेत्यानं प्रामाणिकपणे उत्तर दिलं.
मनोज वाजपेयी म्हणाले, "ईर्ष्या वाटायची असेल तर त्या व्यक्तीबद्दल वाटेल, ज्याला मी जवळून ओळखतो. इरफान खानबद्दल मला कधीही हेवा वाटला नाही. त्याचं आणि माझं सर्कल हे वेगळं होतं. आमचे काम करण्याची पद्धतही खूप वेगळी होती. पण, आम्हाला एकमेकांप्रती खूप आदर होता. तसं पाहायला गेलं तर इरफानपेक्षा मला शाहरुखबद्दल ईर्ष्या वाटायला हवी. कारण, आम्ही जास्त जवळ होतो"
मनोज यांनी 'मकबूल' चित्रपटाचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, 'या चित्रपटातील मुख्य भूमिका सुरुवातीला ही भूमिका के.के मेनन साकारणार होता आणि त्यासाठी त्यानं केसही वाढवले होते. पण, चित्रपट उशिरा आल्यामुळे ही भूमिका इरफान खानकडे गेली. मी विशालला अनेक वेळा फोन केला, पण तो नकार देत राहिला. त्याला असे वाटत होते की मी नुकताच 'सत्या' केला असल्याने, माझ्यात भिखू म्हात्रेची झलक दिसेल, ज्यामुळे ही भूमिका योग्य वाटणार नाही".
मनोज वाजपेयी यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतंच त्याचा 'इन्सपेक्टर झेंडे' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) तुम्हाला हा चित्रपट पाहता येईल. मराठमोळे पोलीस अधिकारी मधुकर झेंडेंनी चार्ल्स शोभराजला (Charles Sobhraj) दोनवेळा पकडलं होतं. त्यांच्याच धाडसी कामगिरीवर आधारीत हा चित्रपट आहे.