Join us  

 सलमान,अक्षय, करणचा मला संपवण्याचा कट..! केआरके वाटतेय जीवाची भीती 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 1:59 PM

केआरकेचे ट्विट, लोकांनी घेतली मजा

ठळक मुद्दे‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या निमित्ताने अलीकडे केआरकेने अक्षय कुमारवर निशाणा साधला होता.

स्वत:ला बॉलिवूडचा सर्वात मोठा समिक्षक मानणारा केआरके अर्थात कमाल खान कधी काय बोलेल याचा नेम नाही. केआरके आणि कोन्ट्रॉव्हर्सी असे समीकरणच जणू बनले आहे. नेहमीच वादग्रस्त ट्विट करुन केआरके चर्चेत राहतो. आता त्याने एक असे ट्विट केले की, सगळेच हैराण झालेत. ‘माझ्या जीवाला काही झाले तर त्याला अक्षय कुमार, सलमान खान, करण जोहर व आदित्य चोप्रा जबाबदार असतील, असे धक्कादायक ट्विट त्याने केले‘मी सर्वांना सांगू इच्छितो की, मला काही झाल्यास त्याला करण जोहर, सलमान खान, साजिद नाडियाडवाला, अक्षय कुमार व आदित्य चोप्रा जबाबदार असतील. कारण या लोकांनी मला संपवण्याचा कट रचला आहे,’ असे केआरकेने ट्विट मध्ये लिहिले आहे. आपल्या या ट्विटमध्ये त्याने पीएम मोदी, अमिता शाह आणि काही वृत्त वाहिन्यांनाही टॅग केले आहे.

आपल्या जीवाला धोका आहे, असे केआरकेला का वाटतेय हे ठाऊक नाही. पण तूर्तास केआरकेच्या या ट्विट वर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात बहुसंख्य लोकांनी त्याला ट्रोल केले आहे. केआरके केवळ कंगनाला कॉपी करतोय, तो कंगना राणौतचे ‘मेल व्हर्जन’ आहे, असे युजर्सनी म्हटले आहे. काहींनी तर केआरकेचे ट्विट म्हणजे खूप मोठा विनोद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

अलीकडे केआरकेने अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या आगामी सिनेमाची खिल्ली उडवली. ड्रग्ज प्रकरणावरून करण जोहरला धारेवर धरले आणि सलमानच्या अनेक सिनेमांवरून त्याच्यावरही वाट्टेल तसे तोंडसुख घेतले. आता या सर्वांकडून केआरकेला जीवाला धोका जाणवत असेल तर त्यात हैराण करणारे काहीही नाही. तसेही वादग्रस्त ट्विट करून चर्चेत राहणे केआरकेची सवय आहे.

 प्रेक्षक तुलाही धडा शिकवतील...! रिया चक्रवर्तीला पाठींबा देणा-या आयुष्यमान खुराणावर बरसला केआरके

हा कॅनडा नाही भारत...‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या निमित्ताने अलीकडे केआरकेने अक्षय कुमारवर निशाणा साधला होता. ‘देवी लक्ष्मी धन आणि सौभाग्यचे प्रतिक आहे. अक्षय कुमारने देवी लक्ष्मीचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी प्रेक्षकांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बहिष्कार टाकावा.  हा कॅनडा नाही भारत देश आहे. इथे देवी-देवतांची पुजा केली जाते. त्यांची चेष्ठा करत नाही,’ अशा आशयाचे ट्विट करुन त्याने ‘लक्ष्मी बॉम्ब’वर बंदी घालण्याची मागणी केली होती.

 

टॅग्स :कमाल आर खानसलमान खानअक्षय कुमार