Join us  

Birthday Special : फिल्मी आहे हेमा मालिनी व जितेन्द्र यांच्या ‘न झालेल्या’ लग्नाची गोष्ट...

By रूपाली मुधोळकर | Published: October 16, 2020 8:00 AM

‘ड्रिमगर्ल’ हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस.

ठळक मुद्दे‘बियॉण्ड द ड्रीम गर्ल’ या हेमा यांच्या बायोग्राफीत हा संपूर्ण किस्सा आहे.

आज (16 ऑक्टोबर) ड्रिमगर्ल हेमा मालिनी यांचा वाढदिवस. 70-80 च्या दशकात ‘ड्रिमगर्ल’ म्हणून नावारूपास आलेल्या हेमा यांनी उण्यापु-या 14 व्या वर्षी आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात केली. त्यांच्या सौंदर्या आणि अदाकारीने अशी काही जादू केली की, पहिल्या चित्रपटानंतर त्यांच्याकडे दिग्दर्शकांची रांग लागली आणि त्यामुळे मनात असूनही त्या शालेय शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत.हेमा मालिनी यांचा पहिला चित्रपट 1961 मध्ये रिलीज झाला़  या चित्रपटाचे नाव होते, ‘पांडव वनवासन’. या तेलगू चित्रपटात हेमा यांनी एका नर्तकीची भूमिका साकारली होती. ‘सपनों का सौदागर; या चित्रपटातून हेमा यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. 1968 मध्ये आलेल्या या चित्रपटात हेमा मालिनी राज कपूर यांच्या हिरोईन होत्या. यावेळी हेमा मालिनींचे वय होते 20 वर्षे आणि राज कपूर त्यांच्यापेक्षा 24 वर्षांनी मोठे होते.

हेमा यांच्या सौंदर्यावर धर्मेन्द्र फिदा होते. पण त्यांच्याशिवाय जितेन्द्र आणि संजीव कुमार हेही रांगेत होते. गंमत अशी की, यापैकी जितेन्द्र यांच्यासोबत हेमा यांचे लग्नही होणार होते. पण हे लग्न म्हणजे जबरदस्तीचा मामला होता.

‘बियॉण्ड द ड्रीम गर्ल’ या हेमा यांच्या बायोग्राफीत हा संपूर्ण किस्सा आहे. तर जितेन्द्र व हेमा मालिनी यांचे लग्न होणार होते. पण हे लग्न म्हणजे हेमा मालिनी यांच्यासाठी जबरदस्तीचा मामला होता. कारण हेमा मालिनी तेव्हा धर्मेन्द्र यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. जितेन्द्र्र यांना हेमा आवडायच्या. पण हेमा यांनी जितेन्द्र्र यांना कधीच प्रतिसाद दिला नाही. सरतेशेवटी हेमा यांनी धर्मेन्द्र यांच्याबद्दल जितेन्द्र यांना सांगितले. यानंतर जितेन्द्र व हेमा यांनी मित्र बनून राहण्याचा निर्णय घेतला. मग हे प्रकरण लग्नापर्यंत कसे पोहोचले तर कुटुंबामुळे.

होय, हेमा यांना धर्मेन्द्र यांच्यासोबत लग्न करायचे होते. पण कुटुंबाचा विरोध होता. मग काय, कुटुंबीयांनी लवकरात लवकर हेमांचे लग्न उरकून टाकण्याचा निर्णय घेतला. जितेन्द्र यांचे स्थळ हेमासाठी परफेक्ट होते. कुटुंब राजी होते आणि कुटुंबाच्या इच्छेखातर हेमा यांनाही राजी व्हावे लागले. जितेन्द्र यांना धर्मेंद्र व हेमा यांच्याबद्दल ठाऊक असूनही तेही लग्नासाठी तयार होते. अखेर लग्न ठरले. श्विाय  लग्नात कुठलेही विघ्न नको म्हणून लग्नासाठी मद्रास हे ठिकाण निवडण्यात आले.

हेमा, जितेन्द्र आणि त्यांचे कुटुंबीय  मद्रासला पोहोचले होते. पण का कशी पण तिथल्या एका वृत्तपत्राला या लग्नाची कुणकुण लागली आणि त्यांनी हे वृत्त प्रसिद्ध केले. या  वृत्ताने अनेकांनाच धक्का बसला. धर्मेन्द्र यांना तर जबर धक्का बसला. त्यांनी काय करावे तर त्यांनी थेट जितेन्द्र यांची तत्कालीन प्रेयसी शोभा सिप्पी यांच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर ते दोघेही मद्र्रासला रवाना झाले. हा सगळा एपिसोड कुठल्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हता.झाले धर्मेन्द्र लग्नस्थळी धडकले. आता धर्मेन्द्र यांना पाहून हेमा यांच्या कुटुंबीयांची काय प्रतिक्रिया असेल ते तुम्ही समजू शकताच.  हेमा यांच्या वडिलांनी धर्मेन्द्र यांना पाहून त्यांना अक्षरश: धक्के मारून घराबाहेर काढले.  तुम्ही विवाहित आहात, त्यामुळे तुम्ही माझ्या मुलीसोबत लग्न करु शकत नाही, असे ते वारंवार म्हणत होते. खूप प्रयत्नांती धर्मेन्द्र्र यांनी हेमा यांच्याशी एकांतात बोलण्याची परवानगी मिळवली.  

धर्मेन्द्र यांच्याशी बोलल्यानंतर हेमा आपल्या खोलीतून बाहेर आल्या आणि त्यांनी घरातल्या मंडळींकडे काही दिवसांचा अवधी मागितला. पण, लग्न होईल तर आत्ताच, नाहीतर कधीच नाही, अशी भूमिका जितेन्द्र आणि त्यांच्या आईवडिलांनी घेतली. सगळ्यांना हेमा यांच्या उत्तराची प्रतीक्षा होती. अखेर हेमामालिनी यांनी नकारार्थी मान हलवली आणि जितेन्द्रसोबतचे त्यांचे लग्न मोडले. जितेन्द्र यांना हा अपमान सहन झाला नाही. ते तडक त्या ठिकाणाहून निघून गेले. पुढे अर्थातच घरच्यांचा विरोध डावलून हेमा यांनी धर्मेन्द्र यांच्याशी लग्नगाठ बांधली.

टॅग्स :हेमा मालिनीजितेंद्रधमेंद्र