Join us  

NCBने जप्त केलेत तब्बल 45 फोन, उडाली ‘बॉलिवूड’ची झोप!!

By रूपाली मुधोळकर | Published: September 29, 2020 10:27 AM

ड्रग्ज घेणा-या अनेक सेलिब्रिटींची नावे समोर येण्याची शक्यता-सूत्र

ठळक मुद्देफोनवर डंप डाटा येण्यापूर्वी जबाब रिव्ह्यू केल्यानंतर येणा-या निकालानुसार पुढील रणनीती ठरविण्यात येईल.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर येताच बॉलिवूडमधील अनेक मोठे मासे एनसीबीच्या गळाला लागलेत. अनेक मोठे स्टार्स ड्रग्ज कनेक्शनमध्ये फसताना दिसत आहेत. आता या ड्रग्जप्रकरणी नवी घडामोड समोर येतेय. ड्रग्ज प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्धार करणा-या एनसीबीने आत्तापर्यंत 45 मोबाईल फोन जप्त केले आहेत. या मोबाईल फोनमधून बॉलिवूडच्या ‘ड्रग्ज गँग’बद्दल मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. अनेक सेलिब्रिटींची नावे यातून समोर येण्याची शक्यताही वर्तवली जातेय.

‘न्यूज 18’ने दिलेल्या वृत्तानुसार, एनसीबीने जप्त केलेल्या 45 मोबाईल पैकी 15 पेक्षा अधिक मोबाईल फोनचे फॉरेन्सिक रिपोर्ट एनसीबीला मिळाले आहेत. या आधारावर तपासाला नवी दिशा मिळाली आहे. एनसीबीने दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, करिश्मा प्रकाश आणि जया साहा यांचेही फोन जप्त केले आहेत. त्यांच्या मोबाईल फोनचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. यातूनही मोठा खुलासा होऊ शकतो. त्यांच्या मोबाईलचे रिपोर्ट चौकशीसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना अटक केली. शिवाय अनेक पेडलर्सलाही अटक झाली. या सर्वांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनवर डंप डाटा येण्यापूर्वी जबाब रिव्ह्यू केल्यानंतर येणा-या निकालानुसार पुढील रणनीती ठरविण्यात येईल. यामध्ये कॉल डिटेल्स, एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप चॅट यासर्वांचा तपास केला जाईल. 2017 ते 2020 पर्यंत डंप डाटा तपासण्यात येईल. साहजिकच हे सर्व इतके सोपे नाही. यामध्ये अधिक काळ लागू शकतो. सोबतच यादरम्यान, जर काही सुगावा लागला तर कारवाई करण्यात येईल.

एनसीबी अधिका-यांनी क्षितीजला ब्लॅकमेल केले, वकीलाचा दावा 

सुशांत सिंग राजपूत केसशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात गेल्या आठवड्यात एनसीबीने चित्रपट निर्माता क्षितीज प्रसाद याला अटक केली. याच क्षितीजने एनसीबीवर काही गंभीर आरोप केले आहेत. त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी रविवारी मुंबई उच्च न्यायालयात हे आरोप केले. एनसीबीने चौकशीदरम्यान क्षितीजला ब्लॅकमेल केले. त्याला त्रास दिला. इतकेच नाही तर करण जोहर व त्यांच्या टॉप टॉप एक्सीक्युटिव्हची नावे घे, आम्ही तुला सोडून देऊ, असे म्हणत एनसीबी अधिका-यांनी क्षितीजवर दबाव आणला, असे मानेशिंदे म्हणाले. क्षितीजच्या वकीलांनी कोर्टात सांगितले की, एनसीबी अधिका-यांनी चौकशीदरम्यान क्षितीजवर दबाव टाकण्याचा तसेच त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.  करण जोहर, सोमेल मिश्रा, राखी, अपूर्वा, नीरज व राहिल यांची नाव  घेतल्यास आम्ही तुला सोडून देऊ, असे एनसीबी अधिकारी क्षितीजला म्हणाले.

सुशांतची हत्या की आत्महत्या, हे गूढ उलगडणार? एम्सने सीबीआयकडे सोपविला अहवाल

In Pics: रिया कशी देतेय इतक्या हायप्रोफाईल वकीलाची फी? सतीश मानेशिंदे यांनी दिले उत्तर

क्षितीजच्या हवाल्याने वकील मानेशिंदे यांनी न्यायालयाला सांगितले की, ‘एनसीबी अधिका-यांनी मला खोटे आरोप लावण्यास सांगितले. करण जोहर व त्यांची टीम ड्रग्ज घेते, असे बयान देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. त्यांनी माझ्यावर प्रचंड दबाव आणला. मात्र मी त्यांच्या दबावाला बळी पडलो नाही. कारण मी व्यक्तिश: कोणालाही ओळखत नाही. ज्यांना मी व्यक्तिश: ओळखत नाही, त्यांच्यावर मी खोटे आरोप लावू शकत नाही.’

 

टॅग्स :नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोदीपिका पादुकोणसारा अली खान