Join us

धर्मेंद्र यांच्या ‘या’ भावाची गोळी मारून केली हत्या; लोकप्रियताच बनली मृत्यूचे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 15:38 IST

अभिनेते धर्मेंद्र यांचे चुलत भाऊ असलेले वीरेंद्र सिंग देओल ८०च्या दशकात खूप मोठे स्टार होते. पंजाबी सिनेमामध्ये वीरेंद्र हे ...

अभिनेते धर्मेंद्र यांचे चुलत भाऊ असलेले वीरेंद्र सिंग देओल ८०च्या दशकात खूप मोठे स्टार होते. पंजाबी सिनेमामध्ये वीरेंद्र हे नाव खूपच प्रसिद्ध होते. त्याकाळी प्रत्येक निर्माता आणि दिग्दर्शक त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक होता. मात्र एक दिवस अचानक चित्रपटाच्या सेटवरच त्यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती. ही घटना ६ डिसेंबर १९८८ मध्ये घडली होती. त्यावेळी वीरेंद्र ‘जट ते जमीन’ या चित्रपटाची शूटिंग करीत होते. तेव्हा अचानकच कोणीतरी त्यांची गोळी मारून हत्या केली. वीरेंद्र यांची हत्या कोणी केली, हे अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसून, त्याचे रहस्य अजूनही कायम आहे. परंतु असे म्हटले जाते की, वीरेंद्र सिंग यांची लोकप्रियताच त्यांच्या हत्येचे कारण बनली होती. त्यामुळेच कोणीतरी त्यांची गोळी झाडून हत्या केली होती. जेव्हा त्यांची हत्या करण्यात आली तेव्हा त्यांचे वय ४० वर्षे इतके होते. वीरेंद्र यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात १९७५ मध्ये ‘तेरी मेरी एक जिंदडी’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात धर्मेंद्र यांनी त्यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्याकाळी चांगलाच हिट झाला होता. त्यानंतर ‘धमर जीत, कुंवारा मामा, जट शुरमे, रांझा मेरा यार, वैरी जट’ यांसारख्या २५ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. वीरेंद्र यांच्या पत्नीचे नाव पम्मी कौर असे होते. जेव्हा वीरेंद्र यांचा मृत्यू झाला तेव्हा ते रणदीप आणि रमनदीप अशा दोन मुलांचे वडील होते. वीरेंद्र यांची एक मुलगी असल्याचाही दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जातो. मात्र याबाबतचे सबळ असे कुठलेही पुरावे नाहीत. वीरेंद्र आणि त्यांचे चुलत भाऊ अजित सिंग देओल (अभय देओलचे वडील) यांनी एकाच मंडपात दोन सख्या बहिणींबरोबर विवाह केला होता. वीरेंद्र यांनी पम्मी तर अजित यांनी उषाबरोबर लग्न केले होते. प्रसिद्ध धार्मिक शोच्या यात्रे होस्ट म्हणून बघावयास मिळत असलेली दीप्ती भटनागर वीरेंद्र सिंग यांची सून आहे. ती वीरेंद्र यांचा मोठा मुलगा रणदीप याची पत्नी आहे. वीरेंद्र यांचे दोन्ही मुले रणदीप आर्य आणि रमनदीप आर्य सध्या चित्रपटांमध्ये अ‍ॅक्टिव्ह आहेत. रणदीपने ‘कभी आए न जुदाई, कैदी, मुसाफिर हूं यारो’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले, तर त्याचा लहान भाऊ रमनदीप हा अजूनही चित्रपटांमध्ये स्ट्रगल करीत आहे. रमनने २०१२ मध्ये आलेल्या ‘चालीस चौरासी’ मध्ये चित्रपटात सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. दरम्यान, चुलत भाऊ वीरेंद्र यांच्या हत्येमुळे धर्मेंद्र यांना चांगलाच धक्का बसला होता. अल्पावधीत मिळालेल्या अफाट लोकप्रियतेमुळेच त्यांची हत्या केली गेली.