Join us  

सुशांत प्रकरणाला 302 कलम लावण्याचा CBIचा विचार, सिद्धार्थ पिठानीचा नोंदवला जाणार अंतिम जबाब

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2020 5:36 PM

सिद्धार्थ पिठानी हा सुशांत मृत्यू प्रकरणातील अत्यंत महत्वाचा साक्षीदार आहे आणि आता दिल्लीत सिद्धार्थ पिठानीची साक्ष होणार आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला जवळपास तीन महिने उलटून गेले आहेत. तरीही अद्याप सुशांतच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणातील सिद्धार्थ पिठानी हा अत्यंत महत्वाचा साक्षीदार आहे. कारण, तो सुशांतचा मित्र होता. तो त्याच्यासोबत रहात होता. सुशांतचा मृत्यू ज्या दिवशी झाला त्या दिवशी सिद्धार्थ वांद्रेमधील त्याच फ्लॅटवर होता. मात्र सिद्धार्थ सातत्याने आपले जबाब बदलताना दिसतो आहे. सीबीआय सिद्धार्थ पिठानीचा अंतिम जबाब 4 ऑक्टोबरला घ्यायचे ठरविले असल्याचे समजते आहे.

एबीपी माझा न्यूजच्या रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसांपासून सीबीआय इतरांचे जबाब घेत असताना सिद्धार्थ पिठानी मात्र गायब होता. आधी वेगवेगळ्या माध्यमातून रियाची पाठराखण करणारा सिद्धार्थ अचानक बोलायचा बंद झाला. तो मुंबईत नसल्याचे वृत्तही समोर आले. पण आता मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ दिल्लीत आहे. सीबीआयची टीम सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्लीत आली होती तीही आता दिल्लीत पोहचली आहे. आता दिल्लीत सिद्धार्थ पिठानीची साक्ष होणार आहे.

सिद्धार्थ वारंवार आपले स्टेटमेंट बदलतोय हे लक्षात घेऊन आता शेवटची त्याची साक्ष ही कलम 164 नुसार होणार आहे. म्हणजे, आता दिलेली साक्ष त्याला बदलता येणार नाही. काही साक्षीदारांच्या उपस्थितीत ही साक्ष लिहून घेतली जाणार आहे. सिद्धार्थ पिठानी सुशांत प्रकरणातला महत्वाचा साक्षीदार आहे. कारण, सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या बेडरुमचा दरवाजा उघडताना सिद्धार्थ पिठानी होता. सुशांतचा लटवकवलेल्या अवस्थेतला मृतदेह आपणच खाली काढला असे सिद्धार्थने सांगितले आहे. सिद्धार्थने आपल्या जबाबात सुशांत आपल्या रुममध्ये मध्यरात्री 1 वाजता येऊन गेल्याचं तो सांगतो. पण दुसरीकडे रियाला सोडायला सुशांत पहाटे दोन वाजता तिच्या घरासमोर असल्याचेही प्रत्यक्षदर्शी सांगतो. त्यामुळे आता सिद्धार्थ पिठानी शेवटची साक्ष काय देतो हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. 

एबीपी माझा न्यूजच्या रिपोर्टनुसार, दुसरीकडे सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात तपासले गेलेले पुरावे, साक्षी आणि आलेले अहवाल पाहता या  प्रकरणाला 302 कलम लावण्याचा विचार सीबीआय करते आहे. हे कलम लागले तर गु्न्हेगारांना 302 नुसार शिक्षा होऊ शकते. आलेले फॉरेन्सिक रिपोर्टही सुशांतचा मृत्यू होमीसाईड असू शकते असे सांगतो. त्यामुळे त्याबाबत काय करावे याचा विचार सध्या सीबीआय करत आहे. या सर्व घडामोडींसाठी 4 तारीख अत्यंत महत्वाची आहे. हा तपास अंतिम टप्प्यात आला आहे. दुसरीकडे सीबीआयची टीम आता दिल्लीत गेली आहे. त्यामुळे या प्रकरणी काय निकाल लागतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतगुन्हा अन्वेषण विभाग